मुंबई – चालू आर्थिक वर्षात रिझर्व बॅंकेने आपल्या महागाईच्या अंदाजात वाढ करून महागाईचा दर 5.7 टक्के राहील म्हटले आहे. या अगोदर रिझर्व बॅंकेने महागाईच्या दराचा अंदाज 4.5 टक्के इतका जाहीर केला होता. दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या पुढे गेले आहेत.
त्यामुळे भारतामध्ये इंधनाच्या किमती वाढविण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आगामी काळामध्ये महागाईचा दर सर्वसाधारणपणे 5.7 टक्के राहील असे पतधोरण समितीला वाटते. पतधोरण समितीची बैठक समाप्त झाल्यानंतर पतधोरण जाहीर करण्यात आले.
या पतधोरणात दिलेल्या माहितीनुसार या वर्षी रब्बी हंगामात धान्य आणि डाळींचे उत्पादन विक्रमी पातळीवर होणार असल्यामुळे या अन्नघटकाचे दर वाढणार नाहीत. मात्र कच्चे तेल महाग झाल्यामुळे इंधन दरवाढ झाली आहे. त्याचा इतर वस्तूंच्या दरावर परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन मर्यादित प्रमाणात होत आहे. जागतिक बाजारपेठेत तेलबिया आणि खाद्य तेलाचे उत्पादन कमी झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला महाग खाद्य तेलाची आयात करावी लागणार आहे.
त्यामुळे खाद्य तेलाचे दर उच्च पातळीवर राहतील असे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले. रिझर्व बॅंकेने किरकोळ महागाई चार टक्क्याच्या आत रोखण्याचा प्रयत्न करावा असे अर्थमंत्रालयाने रिझर्व बॅंकेला सांगितले आहे. मात्र इंधनाचे दर वाढले असल्यामुळे सध्या मागायचा दर 6.07 टक्क्यावर आहे.
मात्र अशा परिस्थितीतही रिझर्व्ह बॅंकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दर चार टक्के या पातळीवर कायम ठेवला आहे. केंद्र सरकार डाळी व खाद्यतेल इत्यादीच्या किमती नियंत्रणात राहाव्यात यासाठी आवश्यक ठिकाणी हस्तक्षेप करीत आहे. आगामी काळातही सरकारचे याकहे लक्ष राहणार आहे.