तळेगाव स्टेशन, (वार्ताहर) – गुढीपाडव्याचा सण तोंडावर आला असून बाजारात साखरमाळेची (गाठी) मागणी वाढली आहे. साखरेसह इतर कच्चा माल आणि कामगारांच्या वेतनात वाढ झालेली आहे. परिणामी, गाठींचे भावही २० टक्क्यांनी वाढले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये गाठी विक्रीचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. मधुमेहासारखे आजारदेखील याला कारणीभूत असावेत, असा अंदाज आहे. उत्पादन मजुरांअभावी कमी झाले आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होत आहे.
यंदा ५० ग्रॅमपासून पाच किलोपर्यंतची गाठी उपलब्ध आहे. फॅन्सी गाठीची विक्री नगाप्रमाणे होते. त्याचा दर आठशे रुपयांपासून आहे, अशी माहिती गाठी उत्पादक आणि विक्रेता देत आहेत.
गुढीपाडव्याला गुढीला साखरेची माळ घातली जाते. खास करून मावळ तालुक्यातील गावखेड्यातील लोक एकमेकांच्या घरी लहान मुलांना साखरेची गाठी व कडे देतात. होळीपासून गुढीपाडव्याच्या सणापर्यंतच गाठींना मागणी असते.
या काळात लग्न ठरलेल्या व लग्न झालेल्या नववधूला गाठी, साडी-चोळी घेण्याची प्रथा आजही पाळली जाते. गुढीपाडव्या सण जवळ आल्याने गाठी उद्योगाला नव्या जोमाने सुरवात झाली आहे. गाठींचा किरकोळ विक्रीचा भाव १२० ते १४० रुपये किलो आहे. तर ठोक ७० ते ८० रुपये किलो आहे.
सर्वच वस्तूंची भाववाढ
साखरे सोबतच इंधन, साखर पावडर, दोरा, दूध या कच्च्या मालाच्या भावात वाढ झाली आहे. मजुरीचा प्रश्न गंभीर आहे. वाढीव दर देऊनही मजूर मिळत नाहीत. यामुळे हा उद्योग करण्यासाठी अडचण येऊ लागली आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही हा पारंपरिक उद्योग टिकवून ठेवला आहे, असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. ज्यांच्याकडे लहान मुले आहेत, तिथे खाऊ म्हणून गुढीपाडव्याला गाठी पाठवतात. शिवाय, वाग्दत्त वधूला मान म्हणून गाठीचोळी पाठवतात.