नवी दिल्ली – गुजरातच्या जुनागढ येथे प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली इस्लामचे धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमना अजहरी यांना अटक करण्यात आली. त्यांनी आपल्या भाषणात हिंदू समुदायाच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा अजहरी यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
त्यांनी ३१ जानेवारी रोजी हे भाषण केले होते आणि त्यात एका विशिष्ट समुदायाबाबत अत्यंत अश्लाघ्य अशी भाषा वापरली होती. त्यावरून अर्थातच नाराजी निर्माण झाली आणि अजहरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मौलाना आणि सदर कार्यक्रमाचे दोन आयोजक यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम १५३ बी, ५०५(२), १८८, ११४ अन्वये गुन्हा दाखल केला गेला.
अजहरी यांच्या अटकेनंतर घाटकोपर येथे त्यांच्या समर्थकांनी मध्यरात्रीनंतर पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती. त्यांनी असे प्रक्षोभक भाषण देण्याची ही काही पहिली वेळ नाही. पूर्वीही असे प्रकार झाले आहेत. मात्र आताचे त्यांचे भाषण आणि त्यावर झालेली कारवाई यावरून पुन्हा एकदा प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर भाषणाचा मुद्दा चर्चेत आला आहे.
काय असते प्रक्षोभक भाषण?
प्रक्षोभक अथवा द्वेषमूलक भाषणाला इंग्रजीत हेट स्पीच म्हणतात. अशा भाषणाची कोणतीही कायदेशीर व्याख्या निर्धारित नाही. मात्र आपल्या बोलण्याद्वारे अथवा लेखनाद्वारे किंवा इशारे करून दोन समुदायांतील वातावरण बिघडवणे अथवा द्वेष निर्माण करणे किंवा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला जातो तर त्या प्रकाराला हेट स्पीच समजले जाते. कायद्यानुसार असे करणे गुन्हा आहे. अशी विधाने किंवा कृती सामान्यत: एखादा धर्म अथवा समुदाय, जात आणि भिन्न लिंग असलेल्यांबाबत केली जातात. प्रक्षोभक विधाने लोकांना हिंसाचारासाठी उद्युक्त करतात. समाजात अशांतता निर्माण होते. परस्परांच्या प्रती घृणा आणि द्वेषाला प्रोत्साहन मिळते.
काय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य?
प्रक्षोभक विधाने केल्यानंतर किंवा कृत्य केल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा कायम उपस्थित केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या कलम १९ अंतर्गत लेखी अथवा तोंडी स्वरूपात आपले विचार प्रकट करणे अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे. याचा अर्थ घटना देशातील सगळ्याच नागरिकांना बोलण्याचे आणि लिहिण्याचे स्वातंत्र्य देते. मात्र त्याचवेळी याचा अर्थ असाही होतो की तुम्ही द्वेष निर्माण करणारी किंवा चिथावणी देणारी विधाने करू शकत नाहीत.
घटनेच्या कलम १९(२) (६)मध्ये असे म्हटले आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हा निरपेक्ष नाही. याचा अर्थ हा अधिकार मर्यादीत आहे, त्याला काही सीमारेषा आहेत. कोणाला काहीही प्रक्षोभक बोलण्याचा अथवा लिखाण करण्याचा अधिकार नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर दुसऱ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह बोलण्याचा, अन्य जातीबाबत प्रक्षोभक विधान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. २०१७ मध्ये विधी आयोगाने आपल्या अहवालात म्हटले होते की कोणताही बोललेला अथवा लिहिलेला शब्द अथवा इशाऱ्यामुळे जर भय निर्माण होत असेल किंवा हिंसाचाराला प्रोत्साहन मिळत असेल तर ते हेट स्पीच आहे.
काय आहे शिक्षा?
प्रक्षोभक भाषण दिल्याच्या प्रकरणात कलम १५३ ए आणि १५३ एए अन्वये गुन्हा दाखल केला जातो. काही वेळा त्यात कलम ५०५ ही जोडले जाते. कलम १५३ ए नुसार आरोपीला तीन वर्षांची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकते. कोणते धार्मिक स्थळ अथवा सभेच्या ठिकाणी प्रक्षोभक भाषण केले असेल तर शिक्षेचा कालावधी पाच वर्षांचा असू शकतो. कलम ५०५ च्या खंड १ नुसार अन्य समुदायाच्या विरोधात चिथावणी देणे गुन्हा आहे. दोन समुदायांत तेढ निर्माण करणारी विधाने केली जातात तेंव्हा ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल केला जातो. धार्मिक स्थळ अथवा सभेच्या ठिकाणी जर अशी कृती केली गेली असेल तर पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.