Sharad Pawar : येत्या 22 जानेवारीला होणाऱ्या राम मंदिर प्रतिष्ठपणेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. अनेकांना कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र विरोधकांकडून भाजप हा कार्यक्रम निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असल्याचा आरोप केला आहे. यावरून कॉँग्रेससह अनेक नेत्यांनी या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. यातच आता राममंदिराच्या या कार्यक्रमावरून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
शरद पवार म्हणाले की, “अयोध्येचा श्रीराम, हनुमान यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर येथे राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला आहे. राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला. पण आता राम मंदिराचे काम बाजूला राहिले आणि भाजप आणि आरएसएस याचा मतासाठी फायदा करून घेत आहेत. धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी मोदींनी उपवास करावा – शरद पवार
यावेळी शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. “मी राम मंदिराच्या कार्यक्रमाचा आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी राम मंदिरासाठी 10 दिवस उपवास करत आहेत तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा,” असा सल्ला शरद पवारांनी मोदींना दिला. बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील उत्तम पाटील आणि रावसाहेब पाटील यांच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
“या देशात उद्योगपतीची कर्ज माफ होतात पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्तकेले होते. पण आज देखील शेतकरी कर्जात बुडालेला आहे. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात असून अशा लोकांना बाजूला केलं पाहिजे”, असे देखील शरद पवार म्हणाले.