नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या पाणी वाटपासंदर्भात सिंधु आयोगाची येत्या 23 आणि 24 मार्च रोजी बैठक होणार आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या पाणी प्रश्नांसंदर्भात या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. विशेषतः चिनाब नदीवर भारताकडून बांधण्यात येणाऱ्या जलउर्जा प्रकल्पाच्या रचनेबाबत पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला आहे, त्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या कायमस्वरुपी सिंधू आयोगाची ही वार्षिक बैठक असेल. सिंधू जल करारातील तरतूदीनुसार दोन्ही देशातील आयुक्तांची वर्षातून किमान एकदा तरी बैठक होणे अपेक्षित आहे. ही बैठक भारत आणि पाकिस्तानमध्ये आलटून पालटून घेतली जाते. त्यानुसार यावर्षाची बैठक 23-24 मार्च रोजी नवी दिल्लीत होणार आहे, असे सिंधू आयोगातील भारताचे आयुक्त पी.के. सक्सेना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणाऱ्या राज्यघटनेतील कलम 370 अंतर्गत विशेष तरतुदी रद्दबातल झाल्यानंतर दोन्ही आयुक्तांमध्ये होत असलेली ही पहिलीच बैठक असेल. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर या राज्याचे लडाख आणि जम्मू-काश्मीर या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. त्यानंतर भारताने लडाखमध्ये अनेक जलविद्युत प्रकल्प मंजूर केले आहेत.
भारताने या प्रकल्पांबाबत पाकिस्तानला कळविले आहे आणि सिंधू जलआयोगाच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. चिनाब नदीवरील भारतीय जलविद्युत प्रकल्पांच्या डिझाइनबाबत पाकिस्तानच्या चिंतेवरही चर्चा केली जाईल, असे सक्सेना म्हणाले.