नवी दिल्ली: भारतीय लष्कर प्रथमच एक अदृष्य युद्ध लढते आहे. तथापी सध्याच्या या करोना विरूद्धच्या या लढाईत लष्करी यंत्रणा पुरेशी संरक्षित करण्यात आली आहे अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पीटीआय या वृत्तसंथेशी बोलताना दिली.
आज या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, हे युद्ध लढत असताना लष्कराच्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्यात येत असून आरोग्यमंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाच्या साऱ्या सुचना लष्करात अंमलात येत असतातच त्या खेरीज लष्कराचीही स्वताची दक्षता योजना कार्यरत आहे. करोना विरूद्धच्या लढाईत सर्व सरकारी यंत्रणा परस्परांशी उत्तम समन्वय साधून कार्यरत असून या लढाईत लष्करही आपले योगदान देत आहे असे ते म्हणाले. करोना महामारीचा लष्कराच्या संरक्षण सिद्धतेवर काही परिणाम झाला आहे काय असे विचारता राजनाथसिंह म्हणाले की, कोणत्याही आव्हानात्मक स्थितीचा सामना करण्यास लष्कर नेहमीप्रमाणेच सिद्ध आहे. जम्मू काश्मीरातील स्थिती विषयी विचारता ते म्हणाले की, भारतीय लष्कर तेथे आपल्या शत्रुवर वचक ठेऊन आहे. करोनाच्या काळातही पाकिस्तानी लष्कराकडून प्रत्यक्ष ताबा रेषेवर गोळीबार केला जात आहे पण त्याला भारतीय लष्कराकडून तिथल्यातिथे चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील लष्कराशी संबंधीत उद्योगांमध्ये व्हेंटिलेटर्स, पीपीई, आणि अन्य उपयुक्त सामग्री उत्पादीत केली जात आहे अशी माहितीहीं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. लष्करात करोना पसरू नये म्हणून जवानांच्या हालचालींना मर्यादा आणणे, शक्य असेल तेथे वर्क फ्रॉम होमला अनुमती देणे, अशा उपाययोजना तिकडे केल्या जात आहेत असेही त्यांनी सांगितले.