भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट 1992 मध्ये दक्षिण आफ्रिकेवरील 21 वर्षांची बंदी उठल्यानंतर सुरु झाले. हे दोन्ही देश आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 14 कसोटी मालिका खेळले आहेत. यातील 7 कसोटी मालिका दक्षिण आफ्रिकेत तर मालिका भारतात खेळल्या गेल्या आहेत. यामधील एकूण 39 सामन्यांमध्ये भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तर दक्षिण आफ्रिकेकडून दिग्गज अष्टपैलू जॅक कॅलिस आणि हाशिम आमला या फलंदाजांनी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. या लेखाच्या माध्यमातून इतिहासात भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकांमध्ये सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकणार आहोत.
1. सचिन तेंडुलकर, भारत (1741 धावा)
भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच आफ्रिकेचा दौरा केला. यामध्ये खेळल्या गेलेल्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत नवख्या सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. यानंतर सचिन दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2011 पर्यंत एकूण 25 कसोटी सामने खेळला. यामधील 45 डावांत सचिनने 42.46 च्या सरासरीने सर्वाधिक 1741 धावांचा डोंगर उभरला. यामध्ये सचिनच्या 7 शतकांचा आणि 5 अर्धशतकांचा समावेश होता. तर 169 ही त्याची सर्वोच्च वैय्यक्तीक धावसंख्या होती. सचिनच्या इतक्या दमदार कामगिरीनंतरही भारताला आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्यात यश आले नाही.
2. जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिका (1734 धावा)
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये अष्टपैलू जॅक कॅलिस दुसर्या स्थानी आहे. कॅलिसने भारता विरुद्ध खेळलेल्या 18 कसोटी सामन्यांतील 31 डावांमध्ये 69.46 च्या सरासरीने 1734 धावांचा रतीब घातला. यामध्ये त्याची सर्वोच्च वैय्यक्तीक धावसंख्या नाबाद 201 होती. या एका द्विशतकासह कॅलिसने भारताविरुद्ध 6 शतके आणि 5 अर्धशतकेही झळकावली आहेत.
3. हाशिम आमला, दक्षिण आफ्रिका (1528 धावा)
क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात दर्जेदार आणि संयमी खेळाडू म्हणून हाशिम अमलाचे नाव दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट इतिहासात कोरले गेले आहे. अमला कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा दक्षिण आफ्रिकेचा पहिला फलंदाज आहे.
जगातिल इतर गोलंदाजांप्रमाणे आमलाने भारतीय गोलंदाजांनाही जेरीस आणत 21 सामन्यांतील 37 डावांमध्ये 43.65 च्या सरासरीने 1528 धावा कुटल्या आहेत. यामध्ये एक द्विशत, 4 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च वैय्यक्तीक धावसंख्या नाबाद 253 आहे.