नवी दिल्ली – युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) ने जारी केलेल्या अहवालानुसार, 2021 च्या मानव विकास निर्देशांकात भारत 191 देशांपैकी 132 व्या क्रमांकावर घसरला आहे. 2020 च्या मानव विकास निर्देशांकात भारत 189 देशांपैकी 131 व्या क्रमांकावर होता. भारताच्या बाबतीत, 2019 मध्ये एचडीआय 0.645 होता, जो 2021 मध्ये 0.633 वर आला आहे, ज्याला आयुर्मानातील घट (69.7 ते 67.2 वर्षे) कारणीभूत ठरू शकते, असे अहवालात म्हटले आहे.
एखाद्या राष्ट्राचे आरोग्य, शिक्षण आणि सरासरी उत्पन्नाचे मोजमापानुसार मानवी विकासात 2020 आणि 2021 या सलग दोन वर्षांमध्ये घसरण झाली आहे. यापूर्वी पाच वर्ष बराच विकास झाला होता. एकट्या भारताचीच स्थिती अशी नसून जागतिक पातळीवरील परिस्थितीही गंभीर आहे. 32 वर्षांत प्रथमच, जगभरात मानवी विकास थांबला आहे.
अहवालात सांगितल्याप्रमाणे मानवी विकास निर्देशांकात घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे आयुर्मानातील जागतिक घट, जी 2019 मधील 72.8 वर्षांवरून 2021 मध्ये 71.4 वर्षांपर्यंत घसरली आहे.
एचडीआय मानवी विकासाच्या तीन प्रमुख आयामांमध्ये प्रगती मोजते – दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षणाची उपलब्धता आणि एक सभ्य जीवनमान. हे चार निर्देशकांद्वारे मोजले जाते – जन्माचे आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे, शालेय शिक्षण अपेक्षित वर्षे आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न.