रेडा -उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य शासनाने रद्द केल्याच्या निषेधार्थ लाभक्षेत्रातील गावांत संताप व्यक्त होत आहे. या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्रित आले होते. शेतकऱ्यांची ही वज्रमूठ आगामी काही दिवसांत तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.
सकाळपासून तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समर्थनार्थ आणि हक्काच्या पाण्यासाठी करोना काळातही जनता रस्त्यावर उतरली होती. त्यामुळे संपूर्ण तालुका आंदोलनमय झाला होता. निषेध, घोषणाबाजीने आंदोलस्थळ दुमदुमून गेले होते.
भिगवण- शेटफळगडे गटात जिल्हा परिषद सदस्य बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मदनवाडी येथे रास्ता रोको, मुंडन, जोडे मारो आणि घोषणाबाजी करीत आंदोलन केले. भिगवण-बारामती व भिगवण -राशीन रास्ता रोको केला. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांविरोधात
जोरदार घोषणाबाजी करीत संताप व्यक्त करण्यात आला.
वडापुरी येथे जिल्हा परिषदेचे सदस्य तांबिले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. निमसाखर येथील बसस्थानकासमोर रास्ता रोको करण्यात आला. बावडा, लाखेवाडीमध्ये शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला.
कळंब येथील नीरा नदी पुलावर शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने योगेश डोंबाळे यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. सणसर बसस्थानकासमोर शेतकरी कृती समिती व सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्रित आले. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली.
यावेळी तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, भिगवण-शेटफळ जिल्हा परिषद गटाचे सदस्य हनुमंत बंडगर, जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजीत तांबिले, श्री छत्रपती कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे पाटील, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ,
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऍड. रणजीत निंबाळकर आदी तालुका आणि जिल्हास्तरीय पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढविली. यात सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते सहभागी झाल्याने उजनीच्या पाण्याचा वणवा सर्वदूर पेटला असल्याचे दिसून आले.