सातारा – सातारा शहर आणि तालुक्यात करोनाचा कहर थांबायचे नावच घेईना झाला आहे. सातारा तालुक्यात 96 महसुली गावांमध्ये 481 बाधित आढळल्याने सातारा तालुका पंचायत समितीच्या आरोग्य यंत्रणेने स्त्रावाच्या नमुन्यांची संख्या वाढवत दोनशेवर पोहचवली आहे.
करोनाने सातारा तालुक्यात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून जिल्हयातील तालुक्यांची तुलना करता बाधितांच्या संख्येत कराडनंतर सातारा तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
सातारा शहर आणि तालुक्यात करोनाला रोखण्यासाठी नेटाने प्रयत्न असले तरी संख्या वाढती आहे. कंटेनमेंट झोन, क्वारंटाइन, नमुना चाचणीचे प्रमाण वाढवणे आदी उपाय राबवले जात असतानाही नागरिकांकडून उपायांना गांभीर्याने प्रतिसाद दिला जात नाही. सायंकाळी सहानंतर कंटेन्मेंट झोनमध्येच फिरणे, गप्पांचा फड जमविणे यामुळे करोनाची साखळी तुटताना ग्राम समित्यांची दमछाक झाली आहे.
जिल्हयात तब्बल सहाशे गावात करोनाने आपले बस्तान बसविले आहे. कराड व सातारा तालुक्यात प्रत्येकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये साठ वर्षाच्या पुढील व्याधीग्रस्त नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सातारा तालुक्यात जिहे, चोरगेवाडी, भरतगाव, बोरगाव कण्हेरनंतर अंगापूर वंदन व शेळकेवाडी या दोन गावांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. शुक्रवारी रात्री जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालात अंगापूर वंदनमध्ये 6 व शेळकेवाडीत 5 असे 11 नवे रूग्ण आढळून आले आहेत.
दोन्ही गावांत आठवड्यापूर्वी दाखल झालेल्या मूळच्या सातारकर मुंबईकरांनी या गावांचा करोना मीटर वाढवला. “हाय रिस्क’ म्हणून कण्हेरमध्ये दीडशे व शेळकेवाडी येथे पन्नास जणांचे नमुने घेतल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दादासाहेब पवार यांनी सांगितले. लिंब गावातील विठ्ठलवाडी येथे 29 वर्षीय महिला करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन असल्याचे सांगण्यात आले.