कोपरगाव -आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून निघालेला छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, रंगीबेरंगी फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी, सनई-चौघडे, तुतारीचा मंगलमय गजर, देशातील विविध पवित्र नद्यांच्या आणलेल्या पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 18 जोडप्यांच्या हस्ते विधिवत अभिषेक, 350 शिवभक्त जोडप्यांच्या हस्ते मशालींसह महाआरती करण्यात आली.
“हर हर महादेव’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणा, शिवछत्रपतींना मानवंदना देण्यासाठी जमलेली सर्वधर्मीय शिवभक्तांची अलोट गर्दी, पारंपरिक वेशभूषेतील मावळे, भगवे झेंडे फडकावत बेधुंद नृत्य करणारा तरुणवर्ग अशा चैतन्यदायी वातावरणात अभूतपूर्व जल्लोषात येथे मंगळवारी रात्री हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. सोहळ्यास श्री चरित्र श्री शिवमहापुराण कथाकार पंडित ललित नागर महाराज (सैंधवा, मध्य प्रदेश), माजी आ. स्नेहलता कोल्हे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा नेते विवेक कोल्हे, त्यांच्या पत्नी रेणुका कोल्हे, पराग संधान, मोनिका संधान, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, विजय आढाव, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, कैलास जाधव, विजय वाजे, योगेश बागूल, स्वप्नील निखाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, शिवसेनेचे (शिंदे गट) दत्ता पुंडे, महिला आघाडीप्रमुख विमल पुंडे, वैशाली आढाव आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांची महाआरती करून मानवंदना दिल्यानंतर युवा नेते विवेक कोल्हे, पराग संधान यांनी बेधुंद नृत्य करत तरुणांचा उत्साह द्विगुणीत केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अठरापगड जातीच्या 18 जोडप्यांच्या हस्ते विधिवत जलाभिषेक करण्यात आला. या जलकुंभाची पारंपरिक वाद्यांच्या निनादात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी पंडित नागर महाराज, स्नेहलता कोल्हे, विवेक कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे मार्गक्रमण करावे, असे आवाहन केले.