पुणे -“धुरांच्या रेषा हवेत काढी…’ ही वाक्य आता लवकरच इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत. जगातील सर्वांत मोठे “ग्रीन रेल्वे नेटवर्क’ भारतात तयार होत असून, ईशान्येकडील काही राज्य वगळता देशभरात ब्रॉडगेज रेल्वेचे विद्युतीकरण सुपरफास्ट सुरू आहे. तर, डिसेंबर-2024 पर्यंत रेल्वेने 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
तब्बल 14 राज्यांत 100 टक्के इलेक्ट्रिफिकेशन
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार चंदिगढ, छत्तीसगढ, दिल्ली, हरियाणा, हिमाचलप्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, मेघालय, ओडिशा, पुद्दुचेरी, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्य-केंद्रशासित प्रदेशांत
100 टक्के विद्युतीकरण झाले आहे. यात सर्वांत मोठा टप्पा हा उत्तर प्रदेशातील सुमारे
8 हजार 482 कि.मी. अंतराचा आहे.
महाराष्ट्रात जवळपास 95 टक्के
रेल्वेचे सक्षम नेटवर्क असलेल्या महाराष्ट्रातही रेल्वे विद्युतीकरण वेगात सुरू आहे. राज्यातील मध्य रेल्वे विभागाने आधीच 100 टक्के विद्युतीकरण केले आहे. तर, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत आता हे काम वेगात होत आहे. पश्चिम रेल्वेचा कमी भाग राज्यात समाविष्ट आहे. तेथेही रेल्वेने हे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कोकण रेल्वेच्या आव्हानात्मक भागांतही पूर्णपणे इलेक्ट्रिफिकेशन झाले आहे.
रेल्वे विद्युतीकरणाचे फायदे
डीझेलचा वापर पूर्णपणे बंद
प्रदूषणाचे प्रमाण जवळपास शुन्यावर
ट्रेनचा वेग वाढण्यास मदत
रेल्वेच्या खर्चातही बचत
मराठवाड्यामुळे पिछाडी
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात छत्रपती संभाजीनगर-जालना-परभणी-नांदेड, पूर्णा-हिंगोली-वाशिम मार्गांचे विद्युतीकरणही सुरू असले, तरी त्याचा वेग कमी आहे. ते काम पूर्ण होताच; महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण होईल.
ईशान्येकडे अडचण
देशाच्या ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड, सिक्कीम, त्रिपुरा या राज्यांमध्ये आतापर्यंत रेल्वे विद्युतीकरण सुरूच करण्यात आलेले नाही. त्या भागांतील भौगोलिक मर्यादांचा या कार्यात अडथळा येत आहे. तरीही, रेल्वे कर्मचारी विद्युतीकरणाच्या तयारीत आहेत. या भागातील फक्त मिझोराममध्ये विद्युतीकरण झाले आहे, ते अंतर फक्त 9 कि.मी. इतकेच आहे.
राज्य आणि विद्युतीकरण प्रमाण (टक्के)
आंध्र प्रदेश : 96.87, बिहार : 96.42, गोवा : 77.78, गुजरात : 88.58, कर्नाटक : 73.51, केरळ : 90.45, महाराष्ट्र : 94.44, पंजाब : 83.09, राजस्थान : 77.33, तामीळनाडू : 94.94, पश्चिम बंगाल : 90.98