- “लॉकडाऊनची ऐशीतैशी’ : नाणे मावळ परिसरात प्रशासनाचे दुर्लक्ष
- वनसंपदा धोक्यात; नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता
नाणे मावळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर देश “लॉकडाऊन’मध्ये गेला. त्यामुळे राज्यातील सर्वच उद्योग, व्यवसाय बंद झाले. गावाकडील युवकांचा घरी वेळ जात नसल्याने अनेकांनी जंगल पार्ट्या सुरू केल्या आहेत. रिकामटेकड्यांमुळे “लॉकडाऊन’ची ऐशी की तैशी झाल्यामुळे प्रशासनाचे नाणे मावळ परिसराकडे दुर्लक्ष असल्याचे पाहवयाचे मिळत आहे.
नाणे मावळातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत विपूल वनसंपत्ती आहे. याच जंगलामध्ये करोना होणार नाही, अशी भावना अनेकांची झाली आहे. एकत्र येत अनेक युवक पार्ट्या करीत आहेत. सकाळच्या वेळेत सर्व साहित्याची जुळवाजुळव करून युवक जंगलाची वाट धरत आहेत. मध्यांनाच्या आधी जंगलातील सरपण गोळा करून त्यावर चूल मांडून “व्हेज-नॉनव्हेज’ पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. तरुणांबरोबरच लहान मुलेही घोळक्याने एकत्र येऊन क्रिकेट, हॉलीबॉल आदी खेळ खेळत आहेत. नदीवर, विहिरींवर एकत्र पोहण्याचा आनंद घेत आहे.
विपूल वनसंपत्ती बरोबरच नाणे मावळातील अनेक धरणे आहेत. या धरणांच्या “बॅक वॉटर’वर तसेच दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, विहिरींवर अनेकदा एकत्र येत पोहण्याचा आनंद घेत आहे. परंतु एकत्र येत असल्याने याची काय किंमत मोजावी लागू शकते याचाही विसर पडलेला दिसतो.
पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर याच ठिकाणी काळ्या बाजारातून अधिक किंमत मोजून आणलेली दारू रिचवली जात असल्याने खरेच करोनाचे गांभीर्य आहे का असेच म्हणावे लागेल. दुकानातून दुप्पट ते तिप्पट किमतीत दारू विक्री होत असल्याचे चित्र सर्वदूर आहे.
शिरोता वनविभागात सुमारे 12 हजार 840.88 हेक्टर वनक्षेत्र असून, यामध्ये अवघे तीन वनपालांकडे कार्यभार आहे. त्यांच्यातंर्गत 15 कर्मचारी काम करतात. एवढ्या विशाल वनक्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवणे अशक्य आहे. त्यातच जंगलात पार्ट्यांमुळे आग लागुन मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधन संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कामशेत पोलीस ठाण्यात आधीच कुमक कमी असताना पोलिसांनी ग्रामीण व शहरी भागात लक्ष ठेवताना दमछाक होतेय. कुठे नागरिकांना विशेषतः युवकांना याचे गांभीर्य कळणार कधी, आणि स्वतः घरात राहुन जबाबदारी पार पडणार कधी हाच प्रश्न उपस्थित होत आहे.