नवी दिल्ली – मोदी सरकारच्या विरोधात विरोधकांच्या संयुक्त आघाडीची बैठक 12 जून रोजी बिहारमध्ये होणार होती. मात्र ती आता स्थगित झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते हरदीप सिंग पुरी यांनी निशाणा साधला आहे.
आम्हालाही एक जबाबदार विरोधी पक्ष असावा असे वाटते. मात्र या आघाडीतील निम्मे पक्ष नेतृत्व कोणी करायचे यावरून लढत आहेत तर निम्मे पक्ष परस्परांशीच लढत आहेत अशी टीप्पणी त्यांनी केली.
दरम्यान, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या पुरी यांनी यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले. ओडिशा येथील अपघाताच्या घटनेनंतर संपूर्ण देश एकत्र येऊन दु:ख व्यक्त करत असताना देशाच्या विरोधातील कार्यक्रमात सहभागी होणे, त्याबद्दलच्या बेजबाबदार चर्चांमध्ये भाग घेण्याचे प्रकार कॉंग्रेस नेत्यांकडून सुरू असून हे पाहुन अत्यंत वेदना होत आहेत. हा फार निराशाजनक प्रकार आहे.