इस्लामाबाद – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषद बैठकीत काश्मीर मुद्द्यावर झालेल्या चर्चेने पाकिस्तानची नाचक्कीच झाली. मात्र, तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्या बैठकीचे स्वागत करण्याचा आगाऊपणा केला आहे. काश्मीर मुद्दा हा वादग्रस्त विषय असल्याचे भासवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
जगाच्या सर्वोच्च राजनैतिक व्यासपीठाने सुमारे 50 वर्षांत प्रथमच काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. त्या वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी त्या सर्वोच्च व्यासपीठाची आहे, असे ट्विट इम्रान यांनी केले.
त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने लक्ष घालण्याचा हेका पाकिस्तान सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होणे हे आपले मोठे यश असल्याचे भासवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जात आहे.