– इंद्रायणीनगर येथे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
– गळती रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान
इंद्रायणीनगर, दि. 3 – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मागील काही वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात शहरातील बहुतांश भागांमध्ये पुरेसे आणि नियमित पाणी मिळत नाही. असे असाताना महापालिका प्रशासन शहरातील पाणीगळतीकडे दुर्लक्ष करत असल्याने शहरवासीयांमध्ये प्रशासनाविषयी संताप व्यक्त होत आहे.
शहराची तहान भागविणाऱ्या बंदिस्त जलवाहिन्या व त्यावर ठिकठिकाणी असलेले व्हॉल्व्ह यामधून दररोज लाखो लिटर पाणी सर्रास वाया जात आहे. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहवा याकरिता एकीकडे दिवसाआड पाणीपुरवठा करायचा तर दुसरीकडे ऐन तापत्या उन्हाळ्यात पिण्याचे पाणी थेट रस्त्यावर वाया जात असल्याच्या घटना समोर येत असताना त्याकडे पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र सद्या शहरात पहावयास मिळत आहे.
इंद्रायणीनगरमधील सेक्टर क्रमांक तीनमधील सहारा चौकातील रस्त्यावर असलेल्या व्हॉल्व्हमधून दोन तीन दिवस झाले पाण्याचे कारंजे उडत आहेत. शहरातील अनेक नागरिकांच्या घशाला कोरड पडली असताना पाणीपुरवठ्याचे अधिकारी मात्र नागरिकांनी फोन केल्यावर सुद्धा येतो, बघतो, सांगतो अशी टोलवाटोलवी उत्तरे देताना दिसतात. त्यामुळे इंद्रायणीनगर परिसरात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होताना दिसून येत आहे.
अधिकाऱ्यांचे एकमेकांकडे बोट
दोन दिवसांपूर्वी भोसरीतील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील मैदानात सुद्धा पिण्याचे पाणी वाया जात असल्याची घटना उघडकीस आली होती. त्या वेळी सुद्धा काम कुणी करावे यावरून अधिकारी आपली जबाबदारी एकमेकांच्या अंगावर ढकलत असल्याच्या प्रकाराची चर्चा भोसरी परिसरात चांगली रंगली होती. ही घटना ताजी असताना शहरातील पाणीगळतीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे शहरातील पाणीगळती थांबविण्याचे मोठे आव्हान पाणीपुरवठा विभागाच्या समोर आहे.
लांडगे नगरमध्ये व्हॉल्वहमधून पिण्याच्या पाण्याचा अपव्यय सुरू होता. त्याबाबत मी घटना स्थळाचा फोटो व व्हिडीओ पाणीपुरवठा अधिकारी शंकर गुरव यांना पाठविला. त्यांच्याशी संपर्क करून संवाद साधला. या वेळी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन तात्काळ समस्या सोडविण्याचे आश्वासित केले.
– सूरज लांडगे, सामाजिक कार्यकर्ते.