नवी दिल्ली – येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेवर आला तर ते नागरीकांचा मतदानाचा हक्कही काढून घेतील असा इशारा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिला आहे. ते म्हणाले की म्हणूनच सन २०२४ सालच्या निवडणुकांना संविधानाच्या रक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आहे.
अखिलेश म्हणाले की, “भाजपने नवीन संसद बनवली पण प्रश्नांची उत्तरे देण्यापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांनाच या संसदेतून निलंबीत केले. त्यांना संसद चालवायची नाही. लोकांना संविधानिक अधिकारही द्यायचे नाहीत, त्यामुळे जनतेने सावध राहिले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
संसदेत झालेल्या घुसखोरी प्रकरणात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत निवेदन केले पाहिजे या साध्या मागणीवरून सरकारने दोन्ही सभागृहातील एकूण १४६ खासदारांनाच निलंबीत केले आहे. त्या संबंधात त्यांनी ही टिपण्णी केली.
देशातील हुकुमशाही आणि वाढती बेरोजगारी याचा निषेध नोंदवण्यासाठी दोन जणांनी लोकसभेच्या सभागृहात उडी मारून तेथे रंगीत धूर फवारला होता. दोन जणांनी संसदेच्या आवारातही असाच प्रकार केला होता. त्यावरून देशात मोठीच खळबळ उडाली होती. नवीन संसदेची ही इमारत देशातील सर्वात सुरक्षित इमारत असल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात येत होता. तो दावाही फोल ठरला होता. त्या अनुषंगाने अखिलेश यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे.