मुंबई : नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने सतीश उके यांना अटक केली. या छाप्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यानंतर उके यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयासमोर उके यांनी युक्तीवाद केला. मात्र यावेळी त्यांना आश्रू अनावर झाले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचेही वकीलपत्र उके यांनी घेतलेले आहे.
उके यांनी य़ुक्तवाद करत असताना आपण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध केस लढल्याचं सांगितलं. तसेच जस्टीस लोया प्रकरणातही आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता, असंही त्यांनी म्हटलं.
दरम्यान उके आणि त्यांच्या कुटुंबीयांना का अटक करण्यात आली, याची माहिती देण्यात आलेली नाही. कायद्यानुसार हे सांगणे गरजेचं आहे. समन्स 10.30 वाजता पाठविण्यात आले. मात्र अटक सकाळी 06.30 वाजताच झाल्याचं उके यांच्या वकिलांनी नमूद केलं.
दरम्यान उके यांना थेट छापेमारी करून समन्स देण्यात आलं. छापेमारीसाठी पोलिसांची मदत न घेता सीआरपीएफची मदत घेण्यात आली. उके यांना दहशतवाद्याप्रमाणे गुन्हेगार असल्याचे भासविण्यात येत असल्याचा युक्तवाद उके यांच्या वकिलांनी केला.
सकाळी माझ्या बेडरुममध्ये सीआरपीएफचे जवान एके47 घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. अशावेळी घरात घुसून कारवाई करण्यात आली. मी आर्किटेक्ट होतो. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील झालो. मी फडणवीस, नितीन गडकरी यांच्याविरुद्ध खटले लढले. शिवाय माझ्यावर लोया प्रकरणातही दबाव टाकण्यात आला होता, असं उके यांनी म्हटलं. तसेच आपल्याला देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानेच धमकावण्यात आल्याचे सांगत उके न्यायालयातच भावूक झाले होते.
आपण माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात केसेस दाखल केल्या असल्याने फडणवीसांच्या इशाऱ्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप उके यांनी केला. तसेच उके यांचे मोबाईल व लॅपटॉप जप्त करण्यात आले असून यामागे फडणवीस यांच्याविरोधात जमवलेले पुरावे मिटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप उकेंच्या बंधूनी केला आहे.