नागपूर – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील अॅड. सतीश उके यांच्या नागपूरातील घरावर आज पहाटे पाच वाजता ईडीने छापा टाकला आहे. त्यानंतर उके यांना ईडीने ताब्यात घेतला आहे. या कारवाईनंतर नागपूरात एकच खळबळ उडाली आहे. जमीन खरेदी प्रकरणाच्या तपासासाठी ईडीने उकेंच्या घरावर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच नागपुरचा दौरा केला. या दरम्यान उके यांनी तीनवेळा राऊतांचा भेट घेतली. आता उके यांच्या घरावर धाड पडल्यानंतर पुढे पटोलेंच्या घरावर छापा टाकला जाऊ शकतो, पुढल्या काही दिवसांत पटोलेंच्या घरावर धाडी पडल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही. असे राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.
संजय राऊत म्हणाले की, ज्यांच्यावर आरोप केले जाता आहेत, ज्यांच्याविषयी माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जे माहिती देतात, त्यांच्यावर महाराष्ट्रात कारवाई होते. आता चिंतेचा विषय नाही, गमतीचा विषय आहे. आम्हीही माहिती दिली, पुरावे दिलेत. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर केंद्रीय तपास यंत्रणा, पंतप्रधान कार्यालयाने कारवाई केलेली नाही. म्हणून म्हटलं हा गमतीचा विषय आहे, चिंतेचा नाही. आता नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलांवर ईडीची धाड पडली. त्यामुळे भविष्यात नाना पटोलेवर धाडी पडल्या तरी काही वाटणार नाही. राऊत माध्यमांशी बोलत होते.
पुढे राऊत म्हणाले, आमचे विरोधी पक्षातले नेते सांगतात की ‘कर नाही त्याला डर कशाला’. असं असेल तर मग आम्ही दिलेल्या पुराव्यांवर तुमच्या तपास यंत्रणा कारवाई का करत नाहीत? न्यायाचा तराजू सरळ नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पण महाराष्ट्र आणि जिथे भाजपाचा मुख्यमंत्री नाहीत तिथे हा तराजू एका बाजूने झुकलेला आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजक निर्माण करतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर जर कोणी पाळलेल्या गुंडांप्रमाणे करत असेल तर ती संघराज्य व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे. असेही ते म्हणाले आहेत.