आळंदी – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्यासोबतच राज्यभरात विविध गावांमध्ये मराठा समाज बांधवांनी उपोषण, आंदोलन सुरु केले आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतही मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु केले असून या उपोषणास मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारपासून (दि. 26 ऑक्टोबर) उपोषण सुरु करण्यात आले आहे. आळंदीसह परिसरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने उपोषणस्थळी भेट देत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर महाद्वारात हे उपोषण सुरु आहे.
महाद्वारात कॅंडल मार्च –
साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार (दि. 27) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज महाद्वार चौकात कॅन्डल मार्च काढण्यात आला. आम्हाला आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य सरकारने केवळ तारखा दिल्या आहेत. पण निर्णय काही घेतले नाही. त्यामुळे आम्ही आता मागे हटणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांचा उपोषणाला पाठिंबा –
मराठा आरक्षण हा राजकिय मुद्दा नाही तर समाजाचा मुद्दा आहे, त्यामुळे आळंदीतील सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकारी यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे. आळंदीकर ग्रामस्थ, ज्येष्ठ, लहान मुले, महिला, वारकरी मंडळी सर्वजण या उपोषण आंदोलनात सहभागी झाले आहेत.