पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलीस दलात 275 वाहन चालकांची आवश्यकता आहे. मात्र केवळ 98 वाहन आहेत. त्यामुळे अनेक वाहने चालकांच्या प्रतिक्षेत पोलीस मोटार कार्यशाळेत उभी आहेत. अनेक पोलीस कर्मचाऱ्यांची या विभागात बदली केल्यावरही ते चालक म्हणून काम करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली. त्यावेळी शहर पोलीस दलाला पुणे पोलीस आयुक्तालय आणि ग्रामीण पोलिसांकडून एकूण 113 वाहने प्राप्त झाली. त्यापैकी बहूतांश वाहने ही जुनी खटारा झालेली होती. पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी मोठमोठ्या कंपनीच्या सीएसआर फंडातून वाहने घेतली. त्यानंतर शासनाकडूनही काही वाहने प्राप्त झाली. अवघ्या दोन वर्षात खटारा झालेल्या 30 दुचाकी आणि 15 चारचाकी वाहने बाद झाली आहेत. सध्या पोलिसांकडे 110 दुचाकी आणि 126 चारचाकी वाहने आहेत. त्यापैकी 25 दुचाकी आणि 19 चारचाकी वाहने ही केवळ 112 या हेल्पलाइनसाठी राखीव आहेत.
जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस आयुक्तालयाकरिता एक कोटी रुपयांचा निधी वाहन खरेदीसाठी मंजूर झाला आहे. त्यातून 9 ते 10 चारचाकी आणि 25 ते 30 दुचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच आगामी काळात महापालिकेकडूनही 50 दुचाकी पोलीस दलाकरिता मिळणार आहेत. दुचाकी वाहनांची जबाबदारी पोलीस ठाणे स्तरावर बीट मार्शलकडे दिली जाते. मात्र चारचाकी वाहनांकरिता पोलीस मोटार वाहन विभागाकडून चालकाची नियुक्ती होते. दिवसेंदिवस पोलिसांची संख्या वाढत चालली असली तरी चालक म्हणून काम करण्यास बहुतांश जण इच्छुक नसतात.
कर्मचाऱ्यांना नकोय चालकाची जबाबदारी
पिंपरी चिंचवड पोलीस दलाकरिता एकूण 275 वाहन चालकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या केवळ 98 वाहन चालक आहेत. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांवर चालक म्हणून पाठविण्यात आले आहेत. तर काहींना व्हीआयपी बंदोबस्तातील वाहनांवर चालक म्हणून जावे लागते.
हा बंदोबस्त कधी येईल हे सांगता येत नसल्याने काही पोलीस वाहन चालकांना राखीव ठेवावे लागते. त्यामुळे अजून 177 पोलीस वाहन चालकांची गरज आहे. पोलीस प्रशासनाकडून अनेकांची या विभागात बदली केली जाते. मात्र बहुतांश पोलीस कर्मचारी चालकाचे काम करण्यास राजी नसतात. वरिष्ठांच्या हातापाया पडून ते इतरत्र बदली करून घेतात.
“या’ कारणांमुळे नकार
पोलीस दलात चालकाला साहेबांच्या आधी कामावर यावे लागते आणि साहेब घरी गेल्यावर सुट्टी होते. तसेच वरिष्ठांकडून कर्मचाऱ्यास चालक म्हणूनच वागणूक दिली जाते. कधी-कधी ही वागणूक हीनपणाची असल्याचे काही चालकांनी सांगितले. तसेच दिवसभर वाहनात बसून राहिल्यामुळे पाठदुखीचे आजारही होतात.