हिंगोली – हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवानी येथील तरुणाने आई-वडिलांसह भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचत अख्य कुटुंब संपवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मोठ्या मुलानेच आई वडिलांसह लहान भावाची हत्या केली. इतकंच नाही तर हत्या केल्या नंतर त्याने अपघाताचा बनाव रचला, पण पोलिसांनी तपास करत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपीला अटक केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस वाणी शिवारात झालेल्या अपघातातील तीन जणांच्या मृत्यू प्रकरणात घातपात झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून मुलानेच आई, वडिल व भावाचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनैतिक संबंधाला होणाऱ्या विरोधातून त्याने तिघांचा काटा काढल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. बासंबा पोलिसांनी त्यांच्या मुलास अटक केली आहे. हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात गुरुवारी (ता. ११) सकाळी तिघांचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यामध्ये आढळून आला होता. कुंडलीक श्रीपती जाधव (६५), कलावती कुंडलीक जाधव (६०), आकाश कुंडलीक जाधव (२५) अशी मयतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यामध्ये कुंडलिक जाधव यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी त्यांचा मुलगा आकाश हा सिरसम येथे घेऊन जात होता. यावेळी त्याची आई कलावती बाई त्यांच्या सोबत होत्या. डिग्रसवाणी येथून काही अंतरावर असलेल्या एका वळणावर आकाश याला दुचाकीवर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात पडून तिघांचाही मृत्यू झाल्याचे त्यांचा मुलगा महेंद्र जाधव याने पोलिसांना सागितले होते. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती व इतर संशयास्पद बाबी लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश बासंबा पोलिसांना दिले.
त्यावरून बासंबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी, जमादार नाना पोले, खिल्लारे, खंडेराव नरोटे यांच्या पथकाने घटनास्थळी तसेच मयतांच्या घरी जाऊन पाहणी केली. तीनही मयतांच्या घरामध्ये स्वच्छता केलेली दिसून आल्याने पोलिसांच्या मनात संशयाची पाच चुकचुकली. पोलिसांनी मयत जाधव दांम्पत्याचा मुलगा महेंद्र यास चौकशीसाठी ताब्यात घेतले.
क्राईम स्टोरी पाहून हा खुनाचा कट त्याने रचला होता. आधी 9 जानेवारी रोजी आई-वडील व भाऊ या तिघांना चहा मध्ये झोपेच्या गोळ्या टाकून बेशुद्ध केले व एक एकाला मारून टाकले व नंतर अपघाताचा कट रचला व सर्व मृतदेह खड्यात फेकून दिले. पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने तिघांचा खून करून डिग्रसवाणी शिवारात टाकून दिले व अपघाताचा बनाव केल्याचे चौकशीमध्ये सांगितले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
या प्रकरणात महेंद्र जाधव याचे गावात एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्या संबंधाला त्याचे वडिल कुंडलीक जाधव, आई कलावती जाधव व भाऊ आकाश जाधव यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. या वादातून त्याने बुधवारी (ता. १०) रात्री वडिल व भाऊ यांचा खून केला. त्यानंतर आईला सोबत नेऊन डिग्रसवाणी शिवारात मारले. त्या ठिकाणी तिघांनाही दुचाकीसह फेकून देत अपघाताचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.