रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. इर्शाळगडच्या पायथ्याला असलेल्या या वाडीत प्रामुख्याने आदिवासी समाजाची वस्ती आहे.
या घटनेनंतर मुंबईहूनही दोन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. बचावपथकांनी आतापर्यंत 22 जणांची सुखरूप सुटका केली आहे. अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती आहे. इर्शाळवाडी हे एक छोटे गाव असून येथे 50 ते 60 घरांची वस्ती आहे. पावसामुळे इर्शाळगड खडकाचा काही भाग कोसळला असून त्यात अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. गावात जाण्यासाठी पायवाट असल्याने मदत साहित्य पोहचण्यास उशीर होत आहे. पावसामुळे माती निसरडी झाल्याने वाडीपर्यंत पोहोचण्यास मदत पथकाला बचावकार्यात अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे. कोणतीही गाडी याठिकाणी जाऊ शकत नसल्याने NDRF पथकाला हाताने हा सर्व ढिगारा बाजूला करावा लागणार आहे. त्यामुळे हे एक मोठे आवाहन असणार आहे.