मुंबई – देशासह महाराष्ट्रात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला असून, शुक्रवार 5 मे पर्यंत देशभरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतात सर्वाधिक पाऊस पडेल, असा अंदाज आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात वाढ झाली होती. अनेक भागात पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि संत्री कुजली आहेत. कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी आणि गेवराई तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, कंधार येथे आज सकाळी जोरदार पाऊस झाला. बुलढाण्यातील मोताळा येथेही जोरदार पाऊस झाला. आता पुढील पाच दिवसही महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.