पुणे – गेल्या वर्षी संपूर्ण उन्हाळ्यात मान्सूनपूर्व किंवा वळिवाचा पाऊस झाला नव्हता. पण, यंदा देशभरात विविध राज्यांमध्ये सरासरी तब्बल 28 टक्के जादा पाऊस झाला आहे. याबाबत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) माहिती दिली आहे.
यंदा मान्सूनपूर्व काळात मध्य प्रदेशात सरासरीपेक्षा 268 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर, दि. 1 मार्च ते 3 मे
दरम्यान, पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाची 29 टक्के तूट होती. येथे सरासरी 199.9 मिमी पावसाच्या तुलनेत 141.5 मिमी पाऊस झाला आहे. त्याचवेळी उत्तर पश्चिमेकडे म्हणजे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये 18 टक्के जास्त पाऊस झाला. येथे सरासरी 83.4 मिमी पावसाच्या तुलनेत 98.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर द्वीपकल्पीय प्रदेशात 88 टक्के जास्त पाऊस झाला आहे. याशिवाय मध्य भारत म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्रात 268 टक्के जास्त पाऊस झाला आहे. येथे सरासरी 18.2 मिमीच्या तुलनेत 67 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तापमान घटले
यावेळी उन्हाळ्यात ठराविक दिवस वगळता देशभरात तापमान सरासरीच्या तुलनेत सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहिले. पूर्व आणि ईशान्येकडील भाग वगळता देशाच्या मोठ्या भागांमध्ये यावर्षी एप्रिलच्या सुरुवातीपासून पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश भागांत तापमानही सामान्यपेक्षा कमी होते. आता त्यात किंचित वाढ होण्याचा अंदाज आहे.