अवसरी, (वार्ताहर) – अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे गुरुवारी दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्याच्या गाई गोठ्यावरील पत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचे अंदाजे ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी काढणीला आलेली पिके भुईसपाट झाले आहे. शेतात काढून ठेवलेले बाजरी आणि बाजरीची कणसे भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अवसरी खुर्द परिसरात सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे उकाडा वाढला होता. दुपारी तीन वाजता विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह आलेला पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेले आणि काढणीला आलेली बाजरी भूईसपाट झाली.
मंचर पारगाव रस्त्यालगत बाळासाहेब बाबुराव टेमकर यांचा गायींचा गोठा आहे. या गाई गोठ्याचे पत्रे उडून गेले. या वेळी अवसरी-शिरूर रस्त्यावर पाऊस असल्याने या रस्त्यावर वाहतूक बंद होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा मोठा अपघात घडला असता.