सकाळची वेळ. दादा आरामखुर्चीत बसला होता. त्याची नेहमीची सवय. समोर टीपॉयवर चहाचा कप होता आणि हाती होता मोबाइल. आज नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेज तो पाहत होता. किती मेसेज! मेसेज बॉक्स नुसता भरभरून गेला होता. ते पाहत असतानाच रेडिओवरच्या गाण्याचे सूर त्याच्या कानात शिरले.
समुद्री चुहूकडे पाणी
पिण्याला थेंबही नाही
कळा ज्या लागल्या जिवा
मला की ईश्वरा ठाव्या…
दादाला ते गाणे ऐकवेना. त्याच्या मनाला वेदना होऊ लागल्या. उठून त्याने रेडिओ बंद केला आणि पुन्हा तो खुर्चीत एक पाय वर घेऊन बसला. भा. रा. तांब्याचे हे गाणे त्याने किती तरी वेळा ऐकले असेल आजवर. पण आज मात्र ते त्याच्या मनाला भिडले. आज एक जानेवारी. नवीन वर्षाचा पहिला दिवस. परस्परांना शुभेच्छा देण्याचा दिवस. नवीन वर्ष आनंदाचे, सुखासमाधानाचे, भरभराटीचे जावो… अशा सदिच्छा देण्याचे. हे कितवे नवीन वर्ष? त्याने वयाची साठी पार केली होती. म्हणजे किमान गेले पन्नास नववर्षाचे दिवस त्याच्या आठवणीत होते. शाळेतील उत्साह शाळेबरोबरच नाहिसा झाला होता. कॉलेजातील पार्ट्याही विस्मरणात गेल्या होत्या. पुढे व्यवहारीपणा आला होता. आज मोबाइलच्या जमान्यात सारा यांत्रिकपणा आला आहे. नाही आंसू नाही माया असा प्रकार. ज्यांचे चेहरेही नीट आठवत नाहीत, त्यांनाही हाती मोबाइल आहे म्हणून मेसेज पाठवायचे.
त्याचे मन पुन्हा गाण्याकडे वळले. त्याच्या मनात आले, हे गाणे लिहीत असताना भा. रा. तांब्यांची मनस्थिती कशी असेल? “जे न देखे रवी, ते देखे कवी’ असे म्हटले जाते. तसा प्रकार असेल? की त्यांनाही जगाचा असा अनुभव आलेला असेल. काहीही असो, पण हे गाणे ऐकताना असंख्यांना ते अगदी आपल्या अंतरीचे शल्य प्रकट केल्यासारखे वाटत असेल. आज दादालाही ते निखळ अनुभवाचे शब्द जाणवत होते. अनपेक्षित, बोचरे, हृदयाला जखमा देणारे अनुभव.
अण्णा, त्याचे वडील त्याला लहानपणापासून समजावत आले, “दादा, अरे जीवनात पैसा महत्त्वाचा नाही; माणसे महत्त्वाची. पैसा काय येतो, जातो. पण आपल्या माणसांची सोबत सदैव राहते.’
आपली माणसे! त्यांचे शब्द आठवत दादा विषण्ण हसला. हातातील मोबाइल त्याने बाजूला ठेवला. नवीन वर्षाच्या शुभेच्छा तो पाहत होता. व्हॉट्सऍप, फेसबुक, मेसेंजरवर नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा नुसता वर्षाव झाला होता. नातेवाईक, मित्रमंडळी, परिचित-अपरिचितांचे नवीन वर्षाच्या शुभेच्छांचे संदेश येऊन पडले होते. दीडदोनशेच्या वर असतील. त्यातील जवळपास सर्वच मेसेज हे रेडिमेड होते. फॉरवर्ड केलेले होते. मनापासून तयार केलेले, मनातील भावना प्रकट करण्यासाठी स्वत: बनवलेले किती होते? जवळपास नाहीच. सारी कागदी फुले. शोभेची.
नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असा सारा प्रकार. केवळ फॉर्मेलिटी म्हणतात तसा. काहीच्या बाबतीत तर फॉर्मेलिटीही नव्हती. मागाहून आले आहे ना, पाठवा पुढे असा प्रकार. तयार केलेल्या विविध ग्रुपच्या याद्या… त्यातच प्रसंगानुसार बदललेला मजकूर टाकून पाठवलेले मेसेज. अगदी यांत्रिकपणे. मोबाइलवर आयते आलेले आहे, ते पुढे ढकलून द्यायचे म्हणून पाठवलेले. काहींच्या बाबतीत तर ज्यांना मेसेज पाठवायचे त्यांची नावेदेखील माहीत नसावीत. समुद्री चुहूकडे पाणी… इथे समुद्र पाण्याचा नव्हे, माणसांचा होता, मेसेजेसचा होता. आणि पिण्यासाठी पाणी नको होते, तर हवे होते, दोन आपुलकीचे- मायेच्या ओलाव्याचे शब्द… पण नेमके तेच दुर्मिळ झाले होते. तो अशा काहीशा नाराज विचारात असताना मोबाइलची रिंग वाजली. त्याने मोबाइल उचलला…
“हॅलो आजोबा, हॅपी न्यू ईयर…’ त्याच्या सात वर्षांच्या नातवाचे किणकिणत्या आवाजातील शब्द कानात गुंजले. उत्साहाने नुसते ओथंबलेले शब्द. नातवाचा प्रफुल्लित चेहरा नजरेसमोर येताच त्याचा सारा निरुत्साह कुठच्या कुठे पळाला. मोठ्या उल्हासाने दादा म्हणाला, “हॅप्पी न्यू ईयर !’ आणि पुढे त्याचे काहीसे बोबडे बोल तो मनापासून ऐकू लागला. नुकते ऐकलेले गाणे विस्मरणात गेले. मनात आले, आपण उगाचच नाराज होतो. यांत्रिकपणे का होईना इतके लोक आपली आठवण काढतात हे काय कमी आहे? आणि आपली हक्काची नातू मंडळी तर आहेच ना? बाकी सारी आपापल्या व्यापात गुंतलेले असतीलही, पण ही छोटी मंडळी आहे ना हक्काची. या उमलत्या पिढीसाठी तर आपल्याला उत्साहाने म्हटलेच पाहिजे की, हॅपी न्यू ईयर!
अश्विनी महामुनी