जेथ हे संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फांटे । जैसे सरोवर आटे । मग प्रतिमा नाही ।। 156:5 ।। तैसे मनपण मुद्दल जाये । मग अहंभावादिक के आहे? । म्हणोनि शरीरेचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। 157:5 ।।
श्री ज्ञानेश्वरीतील पाचव्या अध्यायातील ओवी क्र. 156 आणि 157 यामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत की, “ज्या पडद्यावर संसाराचे चलतचित्र दिसत आहे तो मनोरूपी पडदा फाटून गेल्यावर आपले संकुचित, स्वतःच्या देहावर अवलंबून असलेले, अस्तित्व आपोआप नाहीसे होते.
ज्याप्रमाणे एखाद्या जलाशयातील पाणी बाष्पीभूत होऊन नाहीसे झाले की त्यातील सूर्याचे प्रतिबिंबरूपी (छोटे) अस्तित्व नाहीसे होऊन तो आकाशातल्या आपल्या मूळ रूपातच दिसू लागतो, त्याचप्रमाणे ज्या मानवाच्या मनाचा लय झाला आहे तो आपल्याला स्वतःच्या ब्रह्मरूपी स्वरूपातच पाहू लागतो.’