अहमदाबाद – गुजरात सरकारने पेपर फुटीमुळे सरकारी पद भरतीसाठी काही दिवसांपूर्वी झालेली लेखी परीक्षा मंगळवारी रद्द केली. दरम्यान, पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे.
गुजरात सरकारच्या वतीने मुख्य लिपिक पदासाठी 12 डिसेंबरला परीक्षा घेण्यात आली. त्या पदाच्या 186 जागांसाठी सुमारे 88 हजार उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. मात्र, त्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघड झाले. आता ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.
नव्या वर्षात मार्चमध्ये पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. आधीच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल करणारे सर्व उमेदवार पुन्हा परीक्षा देण्यास पात्र ठरणार आहेत. संबंधित प्रकरणाचा खटला द्रूतगती न्यायालयात चालवला जाणार आहे. पेपर फुटल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर गुजरात पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली.
त्यांच्याकडून याआधीच लाखों रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. आता मुख्य आरोपी जयेश पटेलही पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. संबंधित प्रकरणात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. परीक्षेआधीच पेपर उपलब्ध करण्यासाठी काही उमेदवारांकडून मोठ्या रकमा घेण्यात आल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.