लखनऊ – वडिलांना कर्ज काढून लग्न करावे लागू नये म्हणून उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात पदवीधर मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रंगोली (जगसरा, दरदोई) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतरौली भागातील जगसरा येथील श्रीराम हे मजूरी करून कुटुंब चालवतात. त्यांना चार मुली आहेत. दोन मुलींचा विवाह झाला असून मयत रंगोलीचा विवाह करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. वडिल श्रीराम हे रंगोलीसाठी चांगले स्थळ शोधत होते. मात्र हुंडा देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. रंगोलीला हे माहित होते. वडिलांना कर्ज घेऊन लग्न करावे लागेल म्हणून तिने आत्महत्येचे पाऊल उचलले.
मृतदेह पाहून बेशुद्ध पडले वडिल
रंगोली काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. खुप वेळ झाला तरिही ती घरी परतली नसल्याने तिचा शोध घेतला तेंव्हा गावाबाहेरील झाडावर तिचा मृतदेह लटकत्या अवस्थेत आढळला. तिचा मृतदेह पाहताच श्रीराम बेशुद्ध पडले. रंगोलीने आत्महत्या का केली हे कोणालाही कळत नव्हते. मात्र, घरी गेल्यावर एक चिठ्ठी सापडली.
सुसाईड नोट –
सुसाईड नोटमध्ये रंगोलीने लिहिले की, “पप्पा मला माफ करा, मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. पप्पा मला अजिबात पसंद नाही की तुम्ही कर्ज काढून माझे लग्न करावे आणि पुन्हा आयुष्यभर ते कर्ज फेडावे. अजून गुंजनचे लग्न होणे बाकी आहे. तिच्यासाठीही तुम्ही कर्ज काढाल. पुर्ण आयुष्यभर तुम्हाला कर्जच फेडत बसावे लागेल. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणालाही दोषी ठरवू नये. प्लीज… माझे पप्पा, माझे कुटुंबियांना कोणी काही करू नये. माझे अफेअर देखील नाहिए. मी माज्या मर्जीने आत्महत्या करतेय.. यात कोणाचा काहीही दोष नाही.”