Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांसमोर शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू असून यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी कोकण दौऱ्यादरम्यान राज्य सरकारबाबत मोठा दावा केला. आदित्य ठाकरे यांनी सरकार 31 डिसेंबरला कोसळणार आहे असे म्हटले होते. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, “सरकार पडते किंवा टिकते यासाठी सभागृहातील संख्याबळावर अवलंबून असते. सभागृहातील संख्याबळावर, बहुमत महत्त्वाचे ठरते. आदित्य ठाकरे म्हटले त्यावर ठरत नसते विधानसभा अध्यक्ष याबाबत कायदेशीर योग्य निर्णय देतील. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लवकरच निर्णय घेतला जाईल.” 31 डिसेंबरपर्यंत ठाकरे गट व शिंदे गट यांच्यातील सुनावणी पूर्ण करणार असल्याचेही अॅड.नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी कोकण विकासाबाबत देखील माहिती दिली. “कोकण किंवा सावंतवाडी मधील अनेक विकासात्मक विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी मी पुढाकार घेईल. कोकणाला 720 किलोमीटरचा अथांग समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून विकास साधला पाहिजे त्यासाठी शासनाने आराखडा तयार केला आहे तसेच मुंबई व कोकणातील सीआरझेड नियम शिथिल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोकणात इको सेन्सिटिव्ह झोन विकासाला अडथळा ठरत आहे त्यामुळे सागरी किनारा पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. तसेच ज्या कंपन्यांनी प्रकल्पासाठी जमीन संपादन केली आहे त्यांनी प्रकल्प सुरू केला नसेल तर ती जमीन पुन्हा शेतकऱ्यांना देता येईल ते जिल्हाधिकारी तपासून निर्णय घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम असायला हवी. त्यासाठी विधीमंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल. कोकणातील मुंबई ते गोवा आणि रेडी ते रेवस दोन रस्ते पायाभूत सुविधांसाठी महत्त्वाचे आहेत,” असेही नार्वेकर म्हणाले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
आदित्य ठाकरे यांनी या 31 तारखेपर्यंत सरकार पडणार असा दावा केला. ते म्हणाले की, “सध्या सुनावणी सुरू असून अध्यक्ष मोहदयांकडे जे ट्रिब्यूनल म्हणून काम करत आहेत. त्यांनी संविधानानुसार घटनाबाह्य सरकार पाडून एकतर निवडणूका जाहीर करणं किंवा यांना बाद करणं अपेक्षित आहे. तर आणि तरच राज्यात लोकशाही जीवंत राहू शकते.”