पुणे -करोनामुळे राज्यात शाळा बंद आहेत. सुरक्षाविषय उपाययोजना राबवून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत पालकांची मते जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून ऑनलाइनद्वारे सर्वेक्षण मोहीम सुरू केली आहे. या सर्वेक्षणाद्वारे मिळणाऱ्या माहितीनुसार शाळाबाबत पुढील निर्णय घेण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
राज्यात 15 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. करोनामुळे शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्यात आले. दरम्यान, शालेय शिक्षण विभागाने करोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग येत्या
15 जुलैपासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे ग्रामीणसह इतर शहरी भागातील शाळा व इतर वर्ग सुरू करण्याबाबत अनेक पालक, शिक्षक यांच्याकडून शिक्षण विभागाकडे वारंवार विचारणा केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) वतीने शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळा,
शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी यांनी पालकांना या सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन करावे, अशा सूचना विद्या प्राधिकरणाचे संचालक दिनकर टेमकर यांनी दिल्या आहेत.