बांदा (उत्तर प्रदेश) – बाहुबली राजकीय नेते मुख्तार अन्सारी यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर, मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने दावा केला की त्यांच्या वडिलांना अन्नातून विष देण्यात आले होते त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आपण कोर्टात जाणार आहोत तेथे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. (Mukhtar Ansari Death)
आपल्या वडिलांच्या मृत्युबद्दल मला प्रशासनाकडून काहीही सांगण्यात आले नाही, मला मीडियाद्वारे याची माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला आलो होतो, पण मला परवानगी नव्हती. त्यांना स्लो पॉयझन दिल्याच्या आरोपाबाबत आम्ही आधीही बोललो आणि आजही तेच बोलू. १९ मार्चला रात्रीच्या जेवणात त्यांना विष देण्यात आलं, आम्ही या बाबत न्यायव्यवस्थेकडे जाऊ, आमचा त्यावर पूर्ण विश्वास आहे असे त्याने म्हटले आहे. उद्या शवविच्छेदन केले जाईल, त्यानंतर ते आम्हाला मृतदेह देतील. त्यानंतर आम्ही पुढील प्रक्रिया (अंत्यसंस्कार) करू.
पाचवेळा आमदार राहिलेले मुख्तार अन्सारी यांच्या निधनाबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. गुरुवारी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्तार अन्सारीच्या कुटुंबाला पाठिंबा देत दुःख व्यक्त केले.मुख्तार अन्सारी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी समाजवादी पक्षाचे नेते अमीक जामी यांनी केली.
एप्रिल 2023 मध्ये, खासदार आमदार न्यायालयाने भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या हत्येप्रकरणी मुख्तार अन्सारीला दोषी ठरवून १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. १९९० मध्ये शस्त्र परवाना मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याप्रकरणी त्याला १३ मार्च २०२४ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
याआधी, डिसेंबर २०२३ मध्ये, वाराणसीच्या खासदार/आमदार न्यायालयाने मुख्तार अन्सारी याला २६ वर्षीय कोळसा व्यापारी नंद किशोर रुंगटा यांच्या हत्येचा साक्षीदार महावीर प्रसाद रुंगटा याला धमकावल्याबद्दल दोषी ठरवले होते आणि त्याला कारावासाची शिक्षा ठोठावली होती.
अन्सारीवरील विषप्रयोगाचा दावा फेटाळला –
मुख्तार अन्सारी याच्यावर विषप्रयेाग करण्यात आल्याचा त्यांच्या मुलाने केलेला आरोप उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक ओ पी सिंग यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्या संबंधातील आरोपाबाबत शवविच्छेदनानंतर निराकरण होईल असे ते म्हणाले.
एएनआयशी बोलताना सिंग म्हणाले, “राज्यात विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत आणि हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: गाझीपूर, मऊ, आझमगड, जौनपूर आणि वाराणसी सारख्या भागात पोलीस आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहेत.मुख्तार अन्सारी हा गुन्हेगार असून त्याच्या मृत्यूचा फारसा विचार करू नये, असे ते म्हणाले.
त्यावर विषबाधा झाल्याचा आरोप करणे हा निराधार आरोप आहे. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल.मुख्तार अन्सारीचा मुलगा उमर अन्सारी याने आपल्या वडिलांना जेवणातून विष दिले गेले असल्याचा दावा केला असून त्या बाबत न्यायव्यवस्थेकडे जाणार असल्याचे त्याने सांगितले आहे.