सातारा – सातारा पालिकेच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावरील टेरेसवर चक्क भंगार मालाची गर्दी करण्यात आली आहे. यामुळे येथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होऊन पालिकेच्या कार्यालयाची वरची जागा भंगार मालाचे गोडाऊन बनले आहे. येथील स्वच्छतेकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने कोणीही यावे आणि येथे कचरा करून जावे अशी परिस्थिती आहे.
सातारा पालिकेत गेल्या दोन वर्षापासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासक अभिजित बापट यांच्या कार्यकाळात अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले. तरी दैनंदिन घडामोडींवर त्यांचे अजिबात नियंत्रण नाही. पालिकेच्या पहिल्या मजल्यावर भांडार विभागाच्या समोरील गच्चीवर भंगार मालाची गर्दी झाली आहे. यामध्ये तुटलेल्या खुर्च्या, तुटलेले बोर्ड, तुटक्या कुंड्या तसेच कालबाह्य झालेल्या दस्तऐवजाच्या पिशव्या आणि गळणाऱ्या जलवाहिन्या यामुळे पालिकेची गच्ची अर्धे तळे आणि अर्धे भंगारमालाचे गोडाऊन झाली आहे. या अस्वच्छतेकडे आणि अव्यवस्थेकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याची परिस्थिती आहे.
पालिकेमध्ये शहर स्वच्छतेसाठी तब्बल 280 कर्मचारी आहेत. शहराची स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करणारी शहराची मातृसंस्था स्वतःच मात्र अस्वच्छतेच्या विळख्यात आहे. भांडार विभाग आणि राष्ट्रीय उपजिविकार रोजगार अभियान या दोन्ही कक्षांच्या समोर असणाऱ्या गच्चीमध्ये ही घाण दिवसेंदिवस पडून असून नुकत्याच झालेल्या पावसानंतर येथे साठून राहिलेल्या पाण्यावर डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येथील स्वच्छता तातडीने न झाल्यास पालिकेतच साथरोग उदभवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सातारा पालिकेच्या आरोग्य विभागाचे आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांनी याचा ऍक्शन प्लॅन बनवावा अशी अपेक्षा असताना राठोड मात्र कागदी घोडे नाचविण्यात मशगुल आहेत. यापेक्षा महत्त्वाचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी प्रशासकीय कामात लक्ष देताना पालिकेच्या दैनंदिन कामकाजावरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये पालिका कार्यालयाची स्वच्छता हा विषय सध्या दुर्लक्षित झाला आहे. पालिकेच्या कार्यालय स्वच्छतेसाठी 11 कर्मचारी तैनात असताना पालिकेच्या गच्चीत अशी अस्वच्छता कशी, असा प्रश्न पालिकेत येणारे सातारकर विचारत आहेत.