बंगळुरु -सौरव गांगुली व विराट कोहली यांच्यात काहीतरी मोठे बिनसल्याची चर्चा तर गेले बरेच दिवस रंगत आहे. मात्र, रॉयल चॅलेंजर बंगळुरु व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बंगळुरुत झालेल्या लाढतीनंतर एकमेकांसमोर येऊनही या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलनही न केल्यामुळे यांच्यात वाद असल्याची चर्चा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष असतानाच कोहलीचे नेतृत्व काढून घेतले गेले होते. तसेच त्याच्या अपयशावरूनही त्याचे संघातील स्थान कोणत्याही क्षणी जाऊ शकते असे संकेतही सातत्याने देण्यात आले होते. त्यावेळी संघ प्रशिक्षक असलेल्या रवी शास्त्री यांच्याशी कोहलीची असलेली जवळीकही गांगुलीला खुपत होती. मुळातच शास्त्री व गांगुली यांच्यातील वाद आधीपासून असल्याने त्याचे फटके कोहलीला बसले व त्याचे संघाचे नेतृत्व गेले अशीही चर्चा होती.
मात्र, त्यानंतर बीसीसीआयमध्ये स्थित्यंतर घडले व गांगुली अध्यक्षपादवरुन पायउतार झाले. त्यानंतर गांगुली यांनी आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स संघाचे संचालक व सल्लागारपद स्वीकारले. या स्पर्धेत या दोन संघात झालेल्या लढतीनंतर विजयी बंगळुरु संघाचा कर्णधार असलेल्या कोहलीने दिल्ली संघाच्या प्रत्येकाशी तसेच सपोर्ट स्टाफमधील सर्वांशी हस्तांदोलन केले मात्र, गांगुलीकडे पाहिलेही नाही.
तसेच गांगुली यांनीही बंगळुरुच्या खेळाडूंची भेट घेतली मात्र, कोहलीशी हस्तांदोलन टाळले. या दोघांनी एकमेकांकडे पाहण्याचेही त्यावेळी टाळले व ही गोष्ट मीडियाच्या नजरेतून सुटली नाही. हाच व्हीडीओ आता प्रचंड व्हायरल होत असून या दोघांमध्ये निश्चितच काहीतरी मोठे बिनसल्याची चर्चा आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
कोहलीने इंस्टाग्रामवरही केले अनफॉलो
ही चर्चा एकीकडे चांगलीच रंगत असताना कोहलीने केलेल्या एका कृतीमुळे या चर्चांमध्ये भरच पडली आहे. कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून गांगुली यांना अनफॉलो केले आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यात एकेकाळी इतके चांगले संबंध असताना अचानक असे काय घडले की गोष्ट इतपर्यंत आली, असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला आहे.