आळंदी – गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. मंगळवार (दि. 19 सप्टेंबर)पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्त शहरात ठिकठिकाणी गणेशमूर्तींचे स्टाॅल उभारण्यात आले असून सजावटीच्या साहित्यांनी दुकाने गजबजली आहेत. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरु आहे. यावर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प आळंदी नगरपरिषदेने केला आहे. त्याचाच भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 4.0” अंतर्गत नगरपरिषदेच्या शाळांमध्ये शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनीही विद्यार्थ्यांसोबत गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.
गणेशोत्सव कालावधित प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलची सजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र हे पदार्थ पाण्यात न विरघळणारे व विषारी आहेत. या मुर्त्यांचे नद्या, तलाव, विहिरी यांमध्ये विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात. परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो. त्यामुळे पर्यावरण पूरक मूर्तीचा वापर, पर्यावरणपूरक सजावट, निर्माल्य संकलन करून खत निर्मिती इत्यादी बाबत जनजागृती करून सणांच्या काळात होणारे जलप्रदूषण कमी होवू शकते.
पर्यावरणपूरक मूर्त्यांमध्ये शाडू मातीपासून बनविलेल्या मूर्तीचा समावेश होतो. या मातीमध्ये कोणत्याही प्रकारची विषारी द्रव्ये नसतात. तसेच या मातीपासून बनविलेल्या मूर्ती पाण्यात विरघळून जातात. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही. गणेशप्रेमी नागरिकांनी पाण्यात न विरघळणाऱ्या व जल प्रदूषण करणाऱ्या गणेश मुर्त्या विकत न घेता पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीच्या मुर्त्या विकत घ्याव्यात किंवा घरच्या घरी बनवून पर्यावरण संवर्धनात योगदान देण्याचा प्रयत्न करावा, यासाठी आळंदी नगरपरिषदेमार्फत शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक 1, 2, 4 च्या शालेय विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. या कार्यशाळेस नयन कळसकर आणि सोनाली खांडे यांनी उपस्थित राहून शाडू मातीच्या गणेश मुर्त्या बनविणेबाबत विशेष मार्गदर्शन केले.
“आळंदी नगरपरिषदेने समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून “माझी वसुंधरा अभियान 4.0″ अभियाना अंतर्गत शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेचे आळंदी नगरपरिषद मार्फत आयोजन केले. या कार्यशाळेत नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा नारा दिला. परिसरातील नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा” – कैलास केंद्रे (मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद)