पुसेसावळी – विटा-महाबळेश्वर राज्य मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघातात सुनीता सदानंद काशीद (वय 61), चंद्रकांत दादोबा काशीद (वय 62), अशोक नामदेव सूर्यवंशी (वय 64) आणि कारचालक योगेश विलास कदम (वय 35, सर्व रा. गव्हाण, ता. तासगाव) हे चौघे जागीच ठार झाले.
विटा हद्दीत शिवाजीनगरच्या पुढे सकाळी 7.15 च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची नोंद विटा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गीतांजली ट्रॅव्हल्सची बस (एआर-01-जे-8452) ही गुरुवारी सकाळी विट्याकडून सातारच्या दिशेने निघाली होती. त्याच वेळी फोर्ड फिएस्टा कार (एमएच-47-एजी-0954) साताऱ्याकडून विट्याच्या दिशेने अतिवेगाने येत होती. विटा हद्दीत शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे उतारावर या दोन्ही गाड्यांची धडक झाली. कारमधून पाच जण प्रवास करत होते. विशेष म्हणजे, अपघातानंतर कारचालकाच्या बाजूला असलेली एअरबॅग वेळीच उघडल्याने, त्या सीटवर बसलेले सदानंद दादोबा काशीद हे बचावले आहेत. कारमधील सर्व जण गव्हाण येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रेसाठी मुंबईहून येत होते.
या अपघातामुळे गव्हाण गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फोर्ड फिएस्टा कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती समजताच विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जखमी सदानंद काशीद यांना पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून, त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात ठार झालेल्या चौघांचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमी सदानंद काशीद हे मुंबईतील महात्मा गांधी मेमोरीयल हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाले आहेत.
मृत चंद्रकांत काशीद हे बॅंक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी होते. अशोक सूर्यवंशी हे सदानंद काशीद यांचे मेव्हणे होत. चंद्रकांत काशिद यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुनीता यांच्या पश्चात पती सदानंद, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.