- घोणशेत येथे बैलाचा मृत्यू
वडगाव मावळ – मुंबई येथून गावी फिरायला आलेल्या चौघांवर बुधवारी (दि. 2) मुसळधार पावसात अंगावर वीज कोसळून जखमी झाले. ही घटना आंदर मावळातील माळेगाव खुर्द येथील टिवई परिसरातील जंगलात घडली. या घटनेत जीवित हानी झाली नाही. तर घोणशेत येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने बैल जागीच ठार झाला.
मावळ तालुक्यातील घोणशेत येथे नाथा सखाराम लंके यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे. निखिल सोमनाथ गारे (वय 14), रेश्मा सोमनाथ गारे (वय 20), सुरेश शंकर गारे (वय 22) व संगीता शंकर कोकाटे (वय 42, सर्व रा. माळेगाव खुर्द, ता. मावळ) असे वीज पडून जखमी झालेल्यांची नावे आहेत.
निवासी नायब तहसीलदार राबसाहेब चाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी चौघे जण हे मुंबई येथील रहिवासी असून, ते गावाकडे फिरण्यासाठी आले होते. बुधवारी (दि. 2) दुपारी टिवई परिसरातील जंगलात आंबे खाण्यासाठी गेले होते. अचानक मुसळधार पाऊस आल्याने आंब्याच्या झाडाखाली उभे होते. आंब्याच्या झाडावर वीज कोसळल्याने चौघेजण जखमी झाले.
जखमींना तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये त्वरित दाखल केले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. धनाजी जाधव यांनी सांगितले. या जखमींना मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी जखमींची चौकशी करून त्यांना धीर दिला.