मुंबई – भारतीय संघाचे माजी सलामीवीर आणि झहीर खानचे प्रशिक्षक सुधीर नाईक यांचे बुधवारी मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. 1974 मध्ये भारतासाठी तीन कसोटी सामने खेळले होते. सुधीर नाईक हे ७८ वर्षांचे असून ते आपल्या मुलीसोबत राहत होते. सुधीर नाईक यांना घराच्या बाथरूममध्ये पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते कोमात गेले आणि पुन्हा बरे होऊ न शकल्यामुळे त्यांचे निधन झाले. नाईक हे मुंबई क्रिकेटमधील अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती होते, अशी भावना मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबईला रणजी करंडक चॅम्पियन बनवले –
नाईक यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला रणजी करंडक चॅम्पियन बनवले. 1970-71 मध्ये सुनील गावसकर, अजित वाडेकर, दिलीप सरदेसाई आणि अशोक मांकड यांसारखे दिग्गज या संघात खेळत नसताना नाईक यांनी 1970-71 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली संघाला रणजी करंडक विजेतेपद मिळवून दिले आहे.
1972 चा रणजी हंगाम सुरू झाला, तेंव्हा सर्व आघाडीचे फलंदाज संघात परतल्यामुळे केवळ 11 खेळाडूंपैकी नाईक हे एकमेव खेळाडू राहिला होते. 1974 मध्ये सुधीर नाईक भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेले आणि कसोटीत पदार्पण केले. बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या डावात नाईकने (77) अर्धशतक झळकावले, पण त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही. ते 85 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 35 पेक्षा जास्त सरासरीने 4376 धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी दुहेरी शतकासह सात शतके देखील झळकावली आहेत.
झहीर खानला दिले प्रशिक्षण –
सुधीर नाईक यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर कोचिंग सुरू केले आणि झहीर खानच्या कारकिर्दीला आकार दिला. नाईक यांनीच झहीर खानला मुंबईत आणले आणि त्याला क्रिकेट चे धडे गिरवायला शिकवले आणि झहीर खान सारखा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज तयार केला.