एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेला आजपासून भारतात प्रारंभ होत आहे. सुमारे दीड महिना चालणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने क्रिकेट हाच धर्म असलेल्या भारतामध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. ही विश्वचषक स्पर्धा भारतातच होणार असल्याने या स्पर्धेतील विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार भारतच असणार आहे. भारताने आपल्याच भूमीवर जर ही स्पर्धा जिंकली तर ते निश्चितच लक्षणीय ठरणार आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास बघता आतापर्यंत ज्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाल्या त्यामध्ये यजमान देशाला अनेक वेळा या स्पर्धेमध्ये यश मिळाले नाही, असेही दिसून येते. पण भारताचा आताचा संघ सर्वात प्रबळ आहे म्हणून क्रिकेटतज्ज्ञही भारताकडे संभाव्य विजेते म्हणून पाहात आहेत.
अर्थात, भारताशिवाय इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशांचाही दावा प्रबळ मानला जातो. 2019 मध्ये झालेली विश्वचषक स्पर्धा इंग्लंडने ज्या शैलीमध्ये जिंकली होती ते पाहता आणि गेल्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये इंग्लंड संघाने ज्याप्रकारे आपली कामगिरी सुधारली आहे ते पाहता इंग्लंडचा संघही या स्पर्धेमध्ये मोठे आव्हान उभे करू शकतो. आतापर्यंत तब्बल पाच वेळा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेल्या ऑस्ट्रेलियाकडेसुद्धा संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात आहे. अनुभव आणि नवोदित यांचे योग्य मिश्रण असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला झटपट क्रिकेटच्या फॉरमॅटमध्ये सहजासहजी हरवणे अवघडच असते. ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने भारतात दरवर्षी खेळत असल्याने त्यांना भारतीय वातावरणाची आणि भारतीय खेळपट्ट्यांची चांगली सवय आहे. साहजिकच त्याचा फायदा त्यांना होणारच आहे.
जगातील बहुतेक सर्वच क्रिकेटतज्ज्ञ अंतिम-4 मध्ये पाकिस्तान संघाचेही नाव घेत आहेत. पाकिस्तानचा संघ निश्चितच बलवान आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये त्यांची कामगिरीही चांगली होत आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या क्षेत्रामध्ये पाकिस्तानचा संघ चांगलाच बलवान मानला जातो. पण भारताच्या ज्या भूमीवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळली जाणार आहे त्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव पाकिस्तानकडे गेल्या काही वर्षांमध्ये अजिबात नाही. गेल्या सात वर्षांमध्ये पाकिस्तानचा एकही खेळाडू भारतात कोणतीही स्पर्धा किंवा सामना खेळलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील राजकीय संबंध बिघडल्याने या क्रिकेट संघामध्ये एकमेकांच्या भूमीवर जाऊन क्रिकेट खेळले जात नाही. त्रयस्थ ठिकाणी दोन देशांमध्ये क्रिकेट होत असले तरी पाकिस्तान संघाला भारतात खेळण्याचा अनुभव नाही, हीच गोष्ट त्यांच्यासाठी नकारात्मक ठरण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा दीर्घकाळाने राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे.
म्हणजेच या स्पर्धेमध्ये सहभाग असलेल्या दहा संघांना एकमेकांविरुद्ध खेळायचे आहे. या स्पर्धेमध्ये कोणतेही गट तयार करण्यात आलेले नाहीत. प्रत्येक देशाला इतर 9 संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून टॉप चारमध्ये यायचे आहे. साहजिकच या फॉरमॅटमध्ये एखादा धक्कादायक पराभवसुद्धा गणित बदलू शकतो. टॉप चारमध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे चार संघ येतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेले श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड हे संघसुद्धा कमकुवत नाहीत. एखाद्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये या संघांनी जर एखाद्या बलाढ्य संघाचा पराभव केला तर निश्चितच संपूर्ण गणित बदलले जाऊ शकते. राउंड रॉबिन पद्धतीमध्ये सर्वच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून विजय मिळवणे अत्यावश्यक असते म्हणूनच भारताला जर आपल्याच भूमीमध्ये विश्वचषक मिळवण्याची कामगिरी करायची असेल, तर साखळी फेरीमध्ये जे नऊ सामने खेळले जाणार आहेत.
त्या सर्वच सामन्यांमध्ये विजय मिळवून टॉपचे स्थान मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. 1983 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने सर्वात प्रथम एकदिवशीय विश्वचषक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले होते. पण त्यानंतर भारतीय संघामध्ये सचिन तेंडुलकरसारखे अनेक दिग्गज खेळाडू असतानाही पुन्हा एकदा हा विश्वचषक मिळवण्यासाठी तब्बल 28 वर्षे लागली होती. 2011 मध्ये भारताने धोनीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा विश्वचषक मिळवला होता. पण गेल्या बारा वर्षांच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू असूनही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. कसोटी क्रिकेटचे अजिंक्यपद स्पर्धेत सलग दोनदा अंतिम फेरीत प्रवेश करूनही भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. साहजिकच हे नकोसे रेकॉर्ड जर पुसून टाकायचे असेल तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सर्वोच्च कामगिरी करून या स्पर्धेत यश मिळवायलाच हवे.
कदाचित रोहित शर्मा, विराट कोहली यांची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा असू शकेल. त्यामुळे ही स्पर्धा त्यांच्यासाठीच नाही तर समस्त क्रिकेट शौकिनांच्या लक्षात राहावी अशाच प्रकारची कामगिरी त्यांनी करणे गरजेचे आहे. अर्थात एकीकडे रोहित आणि विराट निवृत्तीच्या दिशेने वाटचाल करत असले तरी दुसरीकडे शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, सिराज यांसारखे खेळाडू त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारतीय क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे संकेत देत आहेत. भारताचा विद्यमान संघ अशा प्रकारे नवोदित गुणवत्ता आणि अनुभवी गुणवत्ता यांचे योग्य मिश्रण असल्याने प्रत्येक खेळाडूंनी आपल्या क्षमतेप्रमाणे खेळ केला तर या स्पर्धेमध्ये भारताला पराभूत करणे कोणत्याही संघाला निश्चितच अवघड जाणार आहे.
एका महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही विश्वचषक स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हापासून 1975 आणि 1979 या दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवलेला वेस्ट इंडिजचा संघ या 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी स्वतःला क्वॉलिफाय करू शकला नाही यासारखे दुसरे दुर्दैव नाही. 25 वर्षांपेक्षा जास्त काळ जागतिक क्रिकेटवर राज्य करणाऱ्या वेस्टइंडीज संघाला आज विश्वचषक स्पर्धेसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेपासून बाजूला राहावे लागत आहे. सातत्य नसेल आणि हा खेळ जर गांभीर्याने घेतला नाही तर काय होऊ शकते हेच वेस्टइंडीजच्या संघाकडे बघून वाटते. विद्यमान भारतीय क्रिकेट संघातील प्रत्येक खेळाडू आपल्या क्षमतेप्रमाणे सर्वोच्च खेळाचे प्रदर्शन करून भारतीय संघाला विजेतेपदापर्यंत पोहोचवेल, अशी आशा निश्चितच करायला हवी आणि त्यासाठी सर्व संघाला शुभेच्छा द्यायला हव्यात.