जागतिक क्रिकेटमध्ये मानांकनाच्या दृष्टीने पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांमध्ये आज बुधवारपासून लंडनमध्ये कसोटी क्रिकेटच्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. केवळ भारत आणि ऑस्ट्रेलियातील क्रिकेट रसिकच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने जेव्हा कसोटी अजिंक्य स्पर्धेचे नियोजन जाहीर केले होते तेव्हा या स्पर्धेच्या पहिल्या हंगामातही भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. पण दोन वर्षांपूर्वी लंडनमध्येच झालेल्या त्या सामन्यामध्ये न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्यामुळे भारताला विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता न्यूझीलंडपेक्षा बलाढ्य असलेल्या ऑस्ट्रेलियाशी भारताला मुकाबला करायचा आहे. त्यामुळे ही लढत निश्चितच संघर्षमय आणि चुरशीची होणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच चुरशीचे वातावरण राहिले आहे. साहजिकच ही लढत म्हणजे क्रिकेट रसिकांना एक मेजवानी ठरणार आहे.
अर्थात, भारताचा विचार करता आपणच हे विजेतेपद मिळवावे असे तमाम भारतीयांना वाटणे साहजिकच आहे. कागदावर तरी सध्या भारतीय संघ बलाढ्य दिसत आहे. सुमारे दोन महिने 20 षटकांचे झटपट क्रिकेट खेळून भारतीय संघातील अनेक खेळाडू आता हा कसोटी सामना खेळण्यासाठी लंडनमध्ये दाखल झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू मात्र खास कसोटीसाठीच काही दिवस प्रशिक्षण घेत होते. 20 षटकांच्या झटपट क्रिकेटनंतर कसोटी क्रिकेटसाठी वातावरणात जुळवून घेणे भारतीय क्रिकेटपटूंना जेवढ्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात भारत या अजिंक्यपद स्पर्धेत विजयाच्या जवळ जाऊ शकेल, हे निश्चित. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व निर्माण करणाऱ्या भारतीय खेळाडूंना आपला गिअर कसा आणि कधी बदलायचा याची निश्चितच कल्पना असल्याने आयपीएलमध्ये मिळालेल्या अनुभवाचासुद्धा ते कसोटी क्रिकेटसाठी चांगला वापर करू शकतात.
त्रयस्थ ठिकाणी हा सामना होणार असला तरी ऑस्ट्रेलियासाठी हे वातावरण त्यांच्या देशासारखे असणार आहे. विद्यमान भारतीय संघातील अनेक खेळाडूंना इंग्लंडमध्ये खेळण्याचा चांगला अनुभव असल्याने त्याचाही फायदा त्यांना होणार आहे. साहजिकच या पाच दिवसांच्या कसोटीमध्ये जे खेळाडू त्या त्या दिवशी चांगली कामगिरी करतील त्या खेळाडूंचा देशच या अजिंक्यपदावर मोहर उमटवू शकेल, हे निश्चित. भारतीय संघामध्ये नव्या आणि जुन्याचे चांगले मिश्रण आहे. एकीकडे कर्णधार रोहित शर्मा, फॉर्मात असलेला विराट कोहली, मधल्या फळीतील उपयुक्त फलंदाज अजिंक्य रहाणे, गेले अनेक महिने इंग्लंडमध्येच काउंटी क्रिकेट खेळणारा चेतेश्वर पुजारा या अनुभवी खेळाडूंच्या जोडीला रोहितसोबत आघाडीला साथ देणारा गुणवान खेळाडू शुभमन गिल अशी फलंदाजांची चांगली फौज भारताच्या दिमतीला असल्यामुळे, गुणवान यष्टिरक्षक ऋषभ पंतची उणीव भासणार असली, तरी यापैकी दोन किंवा तीन खेळाडूंनी जरी चुणूक दाखवली तरी ऑस्ट्रेलियासमोर मोठे आव्हान उभे राहू शकेल. गोलंदाजीच्या पातळीवरही मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव हे तीनही खेळाडू परकीय देशातील खेळपट्ट्यांवर नेहमीच चांगली कामगिरी करतात, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
त्यांच्या जोडीला रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे फिरकीपटूसुद्धा ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकात दम आणू शकतात. भारतीय फिरकीसमोर नेहमीच कांगारू नांगी टाकतात, असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. साहजिकच अंतिम अकरा खेळाडूंचा संघ निवडताना त्यामध्ये तीन जलदगती गोलंदाज आणि दोन फिरकीपटू अशाप्रकारे संघ निवडण्यात आला, तर निश्चितच आव्हान उभे राहू शकेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अश्विन आणि जडेजा हे फलंदाजीही चांगली करू शकतात. गेल्या काही सामन्यांमध्ये जेव्हा जेव्हा भारतीय संघातील आघाडीची फळी आणि मधली फळी कोसळली आहे तेव्हा तेव्हा अश्विन आणि जडेजा यांनी भारतीय संघाला तारले आहे. अंतिम अकरा खेळाडूंचा संघ निवडताना कोणत्याही प्रकारचा प्रयोग न करता अनुभवाला आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीला प्राधान्य देण्याची गरज आहे. आयपीएलच्या निमित्ताने अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंना भारतीय खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव असल्याने भारतीय गोलंदाजी त्यांना फारशी नवी नाही हेसुद्धा तितकेच खरे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियामध्येसुद्धा एकापेक्षा एक दर्जेदार आणि गुणवान फलंदाज आहेत. डेव्हिड वॉर्नर, स्मिथ लाबुशेन, उस्मान ख्वाजा यांसारख्या अनुभवी फलंदाजांच्या जोडीला कॅमेरून ग्रीनसारखा एक अष्टपैलू खेळाडू या संघात दाखल झाला आहे, ज्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे. ऑस्ट्रेलियाची जलदगती गोलंदाजी सध्या जगात सर्वोत्कृष्ट मानली जाते. या गोलंदाजीचा भारतीय फलंदाज कसा मुकाबला करतात यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे. अनेक वर्षांमध्ये भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी पुरस्कृत कोणतीही अजिंक्यपद स्पर्धा जिंकलेली नाही. या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पुन्हा एकदा ती संधी उपलब्ध झाली आहे. यापूर्वी न्यूझीलंडशी लढताना भारतीय संघाने ती संधी गमावली होती. पण आता त्या अनुभवातून शहाणे होऊनच ऑस्ट्रेलियाशी दमदार मुकाबला करण्याचे आव्हान भारतीय संघाने स्वीकारायला हवे. त्या त्या दिवशी ज्या संघाचे खेळाडू चांगली कामगिरी करतील त्या संघालाच या स्पर्धेमध्ये यश मिळणार आहे यात शंका नाही.
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे या निमित्ताने कसोटी क्रिकेटचाही विजय होणार आहे. कारण 50 षटकांच्या किंवा 20 षटकांच्या झटपट क्रिकेटमुळे कसोटी क्रिकेट धोक्यात आले आहे, अशी आरडाओरड होत असतानाच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या या अंतिम स्पर्धेच्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेल्याचीही बातमी आहे. म्हणजे गुणवत्तापूर्ण आणि कौशल्याचे क्रिकेट बघण्यासाठी क्रिकेट रसिकांना अद्यापही कसोटी क्रिकेटच हवे आहे, याचा हा ढळढळीत पुरावा आहे. हा एक प्रकारे कसोटी क्रिकेटचा विजय होणार असला तरी या अंतिम फेरीत कांगारूंना धूळ चारून भारतीय क्रिकेट संघाने जर विजेतेपदाचा चषक हातात घेतला तर त्यांच्या गेल्या काही वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीला चार चांद लागतील.