लंडन -मागील संपूर्ण दशकात भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची अर्थात आयसीसीची एक स्पर्धा जिंकलेली नाही. आता कसोटी विजेतेपदाच्या अंतिम लढतीसाठी ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारत पात्र ठरल्याने, उद्या दि. 7 पासून सुरू होत असलेल्या या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांवर समान ताण असेल.
या अत्यंत महत्त्वाच्या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागलेले असल्याने दोन्ही संघांसाठी खेळाडूंची निवड ही तारेवरची कसरत ठरणार आहे. भारतापुढे प्रश्न आहे तो फिरकी गोलंदाज किती खेळवायचे हा आणि ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवुड नसल्याने त्याची उणीव कोण भरून काढणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि पॅट कमिन्स नाणेफेकीला जातील, त्यावेळी नाणेफेक जिंकणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.
सामन्याच्या अखेरच्या दोन दिवसांत पावसाची शक्यता असल्याने आणि सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून 12 जूनची तजवीज केली असली, तरी काहीही विपरीत घडू नये, यासाठी दोन्ही कर्णधारांनी आपापले देव पाण्यात ठेवले असतील. याआधी भारताने 2013 मध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. ही आयसीसीची शेवटची मोठी ट्रॉफी भारताने जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघाने तीन फायनल गमावल्या आहेत; आणि चार वेळा उपांत्य फेरीत माती खाल्ली आहे.
तर वर्ष 2021 च्या टी-20 विश्वचषकाच्या प्राथमिक टप्प्यातच भारात बाहेर पडला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये भारतीय संघ नेहमीच बलाढ्य मानला जातो, हा लौकीक टिकवायचा असेल, तर रोहित शर्माच्या “मेन इन ब्लू’ना अंतिम सामना जिंकावाच लागेल. दरम्यान, भारताने खेळलेल्या सहा मालिकांपैकी, दक्षिण आफ्रिकेतला त्यांचा एकमेव मालिका पराभव सोडला तर रोहित शर्माने विराट कोहलीकडून नेतृत्व स्वीकारल्यानंतर संघाच्या मानसिकतेतही सकारात्मक बदल झाल्याचे आजवर दिसून आले आहे.
भारत घरच्या मैदानावर अजिंक्य राहिला, बांगलादेशात थोडीशी भीती निर्माण झाली होती, तर इंग्लंडमध्ये कठोर संघर्षाची मालिका अनिर्णित राहिली. ओव्हलमध्ये 143 वर्षांच्या इतिहासात प्रथमच जूनमध्ये कसोटीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासाठी “मिलियन डॉलर’ प्रश्न आहे तो रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्यापैकी कोणाला खेळवायचे? की दोघांनाही खेळवायचे? या दोघांनाही एकाच संघात खेळवण्याचा मोह रोहित शर्माला होत असेलच; पण आता फक्त उन्हाळ्याची सुरुवात आहे आणि खेळपट्ट्या ताज्या आहेत. हे लक्षात घेता चौथ्या वेगवान गोलंदाजीचा पर्याय सर्वाधिक यशाची खात्री देऊ शकतो.
फलंदाजी विभागात, संघ व्यवस्थापनाला इशान किशनच्या ‘एक्स-फॅक्टर’ची गरज आहे की के एस भरतचे अधिक विश्वासार्ह यष्टिरक्षण कौशल्य हवे आहे, हेही ठरवावे लागेल. वेगवान मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी वेगवान गोलंदाजी विभागात स्वत:ची निवड सार्थ ठरण्यासाठी जीवापाड मेहनत केलेली दिसते. तसेच उमेश यादव आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांच्यात समन्वय असणे आवश्यक ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघ ताजातवाना
आयपीएलच्या प्रदीर्घ सीझननंतर मॅच-फिट झालेल्या भारतीयांच्या तुलनेत ऑस्ट्रेलियन्स जास्त ताज्या मनाने आणि शरीराने फायनलमध्ये जातील. त्यांचे फक्त तीन खेळाडू भारतातील आयपीएलचा भाग होते. पॅट कमिन्सने आयपीएल न खेळता मायदेशी परत जाणे निवडले तर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथने इंग्लंडमधील कौंटी क्रिकेट खेळणे पसंत केले. सलामीवीर उस्मान ख्वाजा मोठ्या मंचावर चमकेल अशी अपेक्षा आहे तर डेव्हिड वॉर्नरला त्याच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात स्वत:चा ठसा उमटवण्याची आणखी एक संधी असेल. अनुभवी ऑफ स्पिनर नॅथन लियॉन सतत अपील करत राहील तर अष्टपैलू म्हणून कॅमेरून ग्रीनचे योगदान अमूल्य असेल.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), आर. अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव. (राखीव: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.)
ऑस्ट्रेलिया संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलॅंड, ऍलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, जोश इंग्लिस, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, (राखीव: मिचेल मार्श, मॅट रेनशॉ)
इंग्लंडमध्ये कसोटी जगज्जेतेपदाचा अंतिम सामना होत आहे. ऑस्ट्रेलिया नेहमी जिंकण्यासाठीच खेळत असतो. आमच्यासमोर तुल्यबळ संघ आहे, हे मान्य केले तरी इंग्लंडमधील वातावरण आणि खेळपट्टया यांचा विचार करता, आमचा सर्वाधिक भर आमच्या वेगवान गोलंदाजीवर असेल. सामना आणि विजेतेपद पटकावून आम्ही चषक उंचावू, याची आम्हाला खात्री आहे.
– पॅट कमिन्स, ऑस्ट्रेलियन कर्णधार
भारतीय संघाचे नेतृत्त्व करताना मी माझ्या क्षमतेच्या 100 टक्के दिले आहे. हे नेतेपद सोडण्यापूर्वी कसोटी जेतेपद देशाला मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे. मला हा सामना आणि पर्यायाने कसोटी विजेतेपद माझ्या देशवासियांसाठी जिंकायचे असून भारतीय क्रिकेटला एका सकारात्मक दिशेने नेण्यासाठीची ही एक उत्तम संधी असेल.
– रोहित शर्मा, भारतीय कर्णधार