महाराष्ट्रात आणि देशाच्या कानाकोपऱ्यात गेल्या काही दिवसांमध्ये घडत असलेल्या विविध प्रकारच्या घडामोडींचा विचार करता पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा जेव्हा अशा प्रकारची चर्चा आतापर्यंत सुरू झाली आहे तेव्हा नेहमी विशिष्ट प्रकारचे चेहरेच या चर्चेत असतात. पण यावेळी जी चर्चा सुरू झाली आहे त्याला विशेष महत्त्व आहे. कारण कधीच अशा प्रकारच्या चर्चेत भाग न घेणाऱ्या आणि कधीच अशा विषयांना प्रतिक्रिया न देणारे सुपरस्टार महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. म्हणूनच हा विषय आता महत्त्वाचा मानावा लागणार आहे.
कोलकाता चित्रपट महोत्सवांमध्ये व्यासपीठावर बोलताना अमिताभ बच्चन यांनी ब्रिटिश काळातील घटनांचा संदर्भ देऊन विद्यमान काळात पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्याचे सूचक विधान केले आहे. याच व्यासपीठावर बोलताना सुपरस्टार शाहरुख खान यानेसुद्धा आपल्या “पठाण’ चित्रपटाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या वादाचा संदर्भ घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तिकडे कोलकात्यात या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्रात मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे याने यापुढे आपण कोणत्याच ऐतिहासिक बायोपिक चित्रपटात काम करणार नसल्याची घोषणा केली.
सुबोध भावे यांच्या “हरहर महादेव’ या चित्रपटावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सुबोध भावे यांनी हा निर्णय घेतला, हे उघड आहे. काही वर्षांपूर्वी निर्माता दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनीही त्यांच्या “झेंडा’ या चित्रपटाबाबत असाच वाद निर्माण झाल्यावर कधीही दिग्दर्शन करणार नाही, अशी घोषणा केली होती. अर्थात त्यानंतर त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन केले ही गोष्ट वेगळी असली, तरी दिग्दर्शक आणि कलाकारांची मानसिकता लक्षात घ्यावी लागणार आहे. मोठ्या पडद्यावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत ही चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्रात एका ग्रंथाला दिलेला सरकारी पुरस्कार परत घेण्यावरूनही वाद सुरू झाला आहे.
ज्या पुस्तकाला हा पुरस्कार देण्यात आला होता त्या पुस्तकावर कोणत्याही प्रकारची बंदी नाही किंवा त्या पुस्तकातील मजकुरावर कोणताही आक्षेप आतापर्यंत घेण्यात आलेला नाही; पण केवळ हे पुस्तक नक्षलवादाचे समर्थन करते या एका कारणावरून या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला दिलेला पुरस्कार मागे घेण्यात आला आहे. एकतर पुस्तक आक्षेपार्ह आहे तर मुळात हा पुरस्कार निवड समितीने द्यायलाच नको होता आणि एकदा दिल्यानंतर तो परत मागे घ्यायला नको होता. या ठिकाणीही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अप्रत्यक्ष गळचेपी झाली आहे. या घटना घडत असतानाच कोल्हापुरात एक वेगळीच घटना घडली. ही घटनासुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची अप्रत्यक्ष गळचेपी मानावी लागेल. कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये मुघल सम्राट बहादूर शाह जफर याचे छायाचित्र ठेवण्यात आले होते. हे छायाचित्र औरंगजेबाचे आहे असा समज करून काही लोकांनी हॉटेलची तोडफोड करून या चित्रालाही नष्ट केले.
ज्या मुघल सम्राटाने भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या उठावाचे नेतृत्व केले होते आणि जो एक महान कवी म्हणून प्रसिद्ध होता तो केवळ औरंगजेबाचा वंशज असल्याच्या कारणावरून किंवा तो औरंगजेब असल्याच्या संशयावरून चित्राला नष्ट करण्यात आले. शाहरूख खानच्या आगामी “पठाण’ या चित्रपटाबाबतही अशाच प्रकारचा निरर्थक वाद झाला आहे. या चित्रपटाचे एक गाणे प्रसिद्ध करण्यात आले त्यामध्ये नायिका दीपिका पदुकोणने केवळ भगव्या रंगाचे कपडे घातले असल्यामुळे त्याला आणि एकूणच या चित्रपटाला आक्षेप घेण्यात आला असून हा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी धमकी दिली जात आहे.
चित्रपटातील कलाकारांनी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत याबाबतही जर आक्षेप घेतले जात असतील तर चित्रपटाची निर्मिती करणेच अवघड होऊन जाईल. कारण भारताचा विचार करता सर्वच जाती धर्मांनी आपापले रंग वाटून घेतले आहेत. त्यामुळे कलाकारांनी कोणत्याही रंगाचे कपडे घातले तरी कोणत्या ना कोणत्या जातीचा किंवा धर्माचा अपमान झाल्याचा आक्षेप घेतला जाणार आहे. साहजिकच सध्या हे जे काही चालले आहे ते निश्चितच चांगले नाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणारेच आहे, हे मान्य करावे लागेल. इतिहासातील घटनांची मोडतोड करून ते पडद्यावर प्रदर्शित करणे चुकीचेच आहे; पण अनेक वेळा सिनेमॅटिक लिबर्टी तत्त्वाचा वापर करून काही गोष्टी बदलल्या जातात.
तो एखादा विशिष्ट प्रसंग रंजक करण्यासाठी लिबर्टी वापरली जाते. पण या लिबर्टीमुळे इतिहासाची मोडतोड होऊ नये याची काळजी निर्माता दिग्दर्शकांनी घ्यायलाच हवी. सुबोध भावे यांनी जी भूमिका घेतली आहे तशाच प्रकारची भूमिका जर निर्माता दिग्दर्शकांनी घेतली तर इतिहासातील महापुरुषांवर चित्रपटच निर्माण होणार नाहीत. भारतीय चित्रपट सृष्टीला शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास आहे आणि या शंभर वर्षातील पहिल्या काही कालावधीमध्ये जास्तीत जास्त चित्रपट हे इतिहासावर आधारित होते.
त्या प्रत्येक चित्रपटात आज कोणाला ना कोणाला काहीतरी आक्षेपार्ह सापडेल अशी परिस्थिती आहे. आता आगामी कालावधीमध्ये अशा प्रकारचे चित्रपट काढायचे असतील तर सेन्सॉरबाह्य सेन्सॉरशिप मान्य करून आक्षेप घेणाऱ्या नेहमीच्या लोकांना असे ऐतिहासिक चित्रपट पहिल्यांदा दाखवावे लागतील. पण अशा चित्रपटांना विरोध करणाऱ्यांमध्येसुद्धा अनेक वेळा एकमत नसते. एखादा गट अशा चित्रपटांना विरोध करतो तर दुसरा गट मात्र समर्थन करतो. अशीही अनेक वेळा परिस्थिती असते. त्यामुळे हा विषय जास्तच गुंतागुंतीचा झाला आहे. कोलकाता चित्रपट महोत्सवामध्ये शाहरूख खानने नाराजी व्यक्त करताना या सर्व परिस्थितीला सोशल मीडिया जबाबदार असल्याचे विधान केले आहे, तेसुद्धा सर्वात महत्त्वाचे आहे. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच चुकीच्या गोष्टी पसरवून तरुणांची माथी भडकवली जातात आणि त्यांना आंदोलनाला प्रवृत्त केले जाते, हे आता लपून राहिलेले नाही.
भारतासारख्या विशालकाय देशामध्ये सोशल मीडिया नकारात्मक भावना निर्माण करत आहे, असे स्पष्ट शब्दात शाहरूख खानने म्हटले आहे. साहजिकच आगामी कालावधीमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा विषय अधिकच पेटण्याची शक्यता आहे. भारतीय घटनेने जो सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे त्याचा निश्चित अर्थ आता सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. व्यक्त होणाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि निषेध करणाऱ्यांनीही योग्य परिस्थिती लक्षात घेऊनच निषेध करायला हवा, हाच संदेश यानिमित्ताने द्यावा लागणार आहे.