महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये बोलताना महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि आगामी कालावधीत या महायुतीमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. काही दिवसांपूर्वी जेव्हा राज ठाकरे यांनी राजधानी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती तेव्हा आणि त्यानंतरच राज ठाकरे महायुतीमध्ये येणार का, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि माध्यमांमध्येसुद्धा विविध प्रकारचे तर्कवितर्क करण्यात येत होते. राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणांमध्ये माध्यमांचे सर्व तर्कवितर्क खोडून काढले आणि मी फक्त नरेंद्र मोदी यांना डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुतीला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे. ती घोषणा करत असताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहनही केले आहे. याचाच अर्थ यावर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याची राज ठाकरे यांची इच्छा नाही.
2019 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती आणि ‘लाव रे तो व्हिडिओ’ हा प्रयोगही लोकप्रिय केला होता. आता पुन्हा एकदा 2014 प्रमाणेच त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यातील महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असला, तरी महायुतीचा एक घटक पक्ष होण्याबाबत अद्यापही राज ठाकरे यांच्या मनात संभ्रम आहे हे या भाषणावरून स्पष्ट होत आहे. कोणत्याही निवडणुकीच्या कालावधीतील जागावाटपाच्या वाटाघाटी आणि तडजोडी मला अजिबात मान्य नाहीत. अशा प्रकारच्या कोणत्याही चर्चेसाठी बसण्याची माझी तयारी नसते, अशी भूमिका घेऊन राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष न होता या युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्यातील भाषणाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक संभ्रम दूर केले ते बरे झाले. कारण, माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या त्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्याकडे देण्याबाबतच्या बातम्यांवर माध्यमांचा जास्त जोर होता; पण या कोणत्याही बातमीमध्ये तथ्य नसल्याची घोषणा करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना हेच माझे अपत्य आहे आणि तेच मी वाढवणार आहे हे अत्यंत स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी सांगितले ते बरे झाले.
भारतीय जनता पक्षाला नेहमीच इतर घटक पक्षांनी आपल्या ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवावी असे वाटत असते; पण कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझ्या ‘रेल्वे इंजिन’ या निशाणीशिवाय इतर कोणती निशाणी घेऊन निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणाही राज ठाकरे यांनी केले तेही बरे झाले. खरे तर सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत वाटाघाटीमध्ये सहभाग घेऊन राज ठाकरे यांना आपल्या पदरी बरेच काही पाडणे शक्य होते; पण तसे न करता त्यांनी फक्त पाठिंबा देण्याची भूमिका घेऊन कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीची तयारी करण्याचा आदेश दिला. कदाचित अमित शहांबरोबर त्यांची जी चर्चा झाली त्यामध्ये जे काही ठरले किंवा त्यानंतर मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बैठकीमध्ये जे काही ठरले ते सर्वच राज ठाकरे यांनी जाहीर केले नसावे. राज ठाकरे यांना पूर्वीपासूनच लोकसभा निवडणुकीपेक्षाही विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये रस आहे. साहजिकच लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा देऊन विधानसभा निवडणुकीसाठी जास्त काही पदरात पाडून घेण्याचीही त्यांची रणनीती असावी.
अर्थात, राज ठाकरे यांनी पाठिंब्याची घोषणा करताना हा बिनशर्त पाठिंबा असल्याचे सांगितले असले, तरी नरेंद्र मोदी यांचे सरकार कशा प्रकारे काम करते यावर माझे लक्ष असणार असल्याचेही त्यांनी सूचित केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लगेच जेव्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात होईल त्यानंतर या निवडणुकीसाठी भाजप आणि मनसे यांच्यामध्ये काय ठरले आहे याबाबत गोष्टी हळूहळू समोर येऊ शकतात. पण लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा जाहीर करून राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे हा निष्कर्ष मात्र निश्चितपणे काढता येऊ शकतो. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-राष्ट्रवादी-शिवसेना हे तीन महायुतीतील घटक पक्ष राज ठाकरे यांच्या या पाठिंबाचा कसा फायदा करून घेतात हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिक, पुणे, ठाणे आणि महाराष्ट्रातील काही शहरी भागांमध्ये राज ठाकरे यांच्या पक्षाचा मोठा प्रभाव आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार नसतो तेव्हा हे मतदार कोणत्या पक्षाला मतदान करतात हेसुद्धा महत्त्वाचे ठरते. राज ठाकरे यांच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे मतदार महायुतीच्या उमेदवारांना मतदान करतील अशी अपेक्षा ठेवावी लागेल. महायुतीच्या उमेदवारांना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यामागे राज ठाकरे यांची निश्चित भूमिका काय याबाबत विविध तर्कवितर्क करण्यात येत असले तरी आगामी कालावधीमध्ये मनसेची राजकीय भूमिका आणि रणनीती ही नेहमीच सत्ता मिळवण्याच्या दिशेने असणार आहे याचे संकेत राज ठाकरे आणि त्यांचे सर्वच नेते देत होते. साहजिकच स्वबळावर इतक्यात सत्ता मिळवण्याची कोणतीही शक्यता नसल्याने ज्यांना सत्ता मिळण्याची शक्यता आहे त्यांच्यासोबत जाण्याची रणनीती आता मनसेला आखावी लागणार आहे. त्या रणनीतीचा एक भाग म्हणूनच लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचे पहिले पाऊल राज ठाकरे यांनी उचलले आहे.
अर्थात, मला जागा वाटपाच्या वाटाघाटी आणि तडजोडी पसंत नाही ही राज ठाकरे यांची भूमिका आधुनिक काळातील राजकारणामध्ये कितपत चालणार आहे हेसुद्धा पाहावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जर राज ठाकरे यांचा पक्ष महायुतीसोबत आला तर त्यांना जागावाटप तडजोडीसाठी बसावेच लागणार आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या या भूमिकेतही बदल होईल, असे वाटते. सध्या तरी राज ठाकरे यांच्या पक्षाने महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका चर्चेत असलेल्या मुद्द्याला पूर्णविराम मिळाला आहे आणि अनेक संभ्रम दूर झाले आहेत.