पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आज इस्लामाबाद हायकोर्टाच्या आवारातच अटक करण्यात आली आहे. ते तेथे त्यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या दोन खटल्याच्या कामकाजासाठी गेले असताना त्यांना पाकिस्तानी रेंजर्सच्या जवानांनी अत्यंत क्रूर पद्धतीने ताब्यात घेतले. या जवानांनी अचानक कोर्टाच्या आवारात धाव घेत परिसराचा ताबा घेतला. इम्रान खान यांच्या सुरक्षा जवानांना दूर सारण्यात आले, त्यांच्या वकिलांवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची गचांडी पकडून त्यांना कारागृहाच्या व्हॅनमध्ये कोंबण्यात आले. कालच त्यांनी आरोप केला होता. “मला ठार मारण्याचा कट आयएसआयने रचला आहे’, असे त्यांचे म्हणणे होते.
हा आरोप केल्यानंतर इम्रान खान यांना दुसऱ्याच दिवशी कारागृहात टाकण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचार, ईश निंदा, लष्कराच्या विरोधातील कटकारस्थान वगैरे कारणांतून एकूण 140 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असे सांगण्यात येत आहे. गेल्या एप्रिल महिन्यात इम्रान खान यांचे सरकार सत्तेवरून खाली खेचण्यात आले. त्यानंतर त्यांनी देशाच्या लोकशाहीसाठी एकाकी लढा पुकारला होता. पाकिस्तानात राजकीय वादातून सरकारकडून माजी पंतप्रधानांना अटक करण्याची मोठी परंपरा आहे. 1962 साली पाकिस्तानचे पाचवे पंतप्रधान हुसेन सुरावर्दी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरही देशविरोधी कारवायांचा आरोप होता. 1974 साली माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांना विरोधकांच्या हत्यांचा कट रचण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
त्यानंतरही हा राजकीय सुडाचा प्रवास असाच सुरू राहिला आणि बेनझीर भुट्टो, नवाज शरीफ यांच्यावरही अटकेची कारवाई करण्यात आली होती. या टप्प्यात आता इम्रान खान यांनाही तशाच कारवाईला सामोरे जावे लागले आहे. इम्रान खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी देशभर निदर्शने सुरू केली असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तान आधीच आर्थिकदृष्ट्या खूप कमकुवत झालेला देश आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळवण्यासाठी बरीच मिन्नतवारी करावी लागत आहे. पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्या देशाच्या चलनाला काही किंमत राहिलेली नाही. देशावरील कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे.
अशा स्थितीत देश आर्थिकदृष्ट्या कसा सावरायचा याची चिंता तेथील राज्यकर्त्यांपुढे असताना त्यांनी हा नवीन खेळ खेळून देशाच्या अस्थिरतेत भरच घातली आहे, असे म्हणावे लागेल. 70 वर्षीय इम्रान खान यांच्यावर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप असले, तरी त्यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी चांगले प्रयत्न केले होते हे नाकारता येणार नाही. अत्यंत काटकसरी उपाययोजना त्यांनी राबवल्या. त्यांनी पंतप्रधानपदावरील व्यक्तीवर नेहमी जो खर्च केला जायचा, तोही त्यांनी कमी केला होता. पंतप्रधानांच्या निवासस्थानी असलेल्या बडेजावालाही त्यांनी कात्री लावली होती. पंतप्रधानांसाठी त्यांच्या निवासस्थानी तातडीने दुधाची सोय व्हावी म्हणून तेथे मोठ्या प्रमाणावर गायी आणि म्हशीही तैनात होत्या. त्यांनी हा गोठा बंद करून टाकला होता.
एवढेच नव्हे तर त्यांनी देशात फिरण्यासाठी स्वतंत्र विमान न घेता प्रवासी विमानांद्वारेच प्रवास सुरू केला होता. त्यांच्या या काटकसरी आणि सुधारणावादी कार्यशैलीमुळे देशात एक नवीन वातावरण तयार होईल अशी अपेक्षा होती. पण त्यांचे हे प्रयत्न तोकडे पडले. दहशतवाद्यांना वेसण घालण्यात त्यांना यश आले नाही. शक्तिशाली लष्करालाही ते वठणीवर आणू शकले नाहीत. तशातच विरोधी पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या पक्षाला सत्तेवरून खाली खेचले आणि तेव्हापासून त्यांची परवड सुरू झाली. त्यांच्यावरही कधी ना कधी अटकेची कारवाई होणार हे सर्वच जण जाणून होते. तेथील राजकीय स्थितीचा अंदाज घेतल्यानंतर एक बाब प्रकर्षाने लक्षात येते की, अलीकडच्या काळात ते राजकारणात एकटे पडले होते.
त्यांच्या पाठीशी पुरेसे संख्याबळ नाही, असे असतानाही त्यांनी जे बेरजेचे राजकारण करणे अपेक्षित होते त्याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. वास्तविक एक क्रिकेटपटू अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी राजकारणात बऱ्याच उशिरा प्रवेश केला; परंतु सातत्याच्या बळावर त्यांनी देशाच्या पंतप्रधानपदालाच गवसणी घातली होती. अर्थात, त्यावेळीही त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नव्हते; पण त्यांनी अन्य पक्षांच्या साथीने आघाडी सरकार स्थापन करण्यात यश मिळवले होते. राजकारणातील त्यांचे हे यश लक्षणीय मानले गेले. त्यांच्या सरकारची सुरुवातही आश्वासक स्वरूपाची राहिली होती. पण नंतर मात्र त्यांची वेगाने घसरण झाली. इम्रान खान यांचे व्यक्तिमत्त्व हे काही कट्टर इस्लामिक पद्धतीचे व्यक्तिमत्त्व नाही. क्रिकेटच्या निमित्ताने त्यांनी जगभर अनेक ठिकाणी भ्रमंती केली. ब्रिटनमध्ये त्यांचे बराच काळ वास्तव्य होते. त्यामुळे आधुनिक विचारशैलीचा त्यांच्यावर पगडा होता.
पाकिस्तानच्या पारंपरिक इस्लामिक कट्टरपंथीय पद्धतीच्या राजकारणाला छेद देण्याचाच त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला. पण त्यांच्या विरोधात विविध कारणांनी जो द्वेष पसरवला गेला, त्याला पायबंद घालण्यात ते कमी पडले असे तेथील एकूण घडामोडी पाहता सहज लक्षात येते. इम्रान खान यांना भारताबरोबर फारसे सलोख्याचे संबंध राखण्यात यश आले नाही हे जरी खरे असले, तरी भारताविरुद्ध आक्रस्ताळी पद्धतीने गरळ ओकण्यावर मात्र त्यांचे बरेच नियंत्रण राहिले असे जाणवले. पण त्यांना या पद्धतीच्या राजकारणाने लाभ होण्याऐवजी तोटाच होताना दिसला. आता या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांना अटक झाल्याने पाकिस्तानचे पुढील राजकारण कोणत्या दिशेने वळण घेणार हे पाहावे लागेल. एक मात्र खरे की या ताज्या घडामोडींमुळे पाकिस्तानच्या अस्थिरतेत भरच पडणार आहे.
त्या देशात आता देशावर एकहाती नियंत्रण मिळवू शकणारा नेता शिल्लक नाही. विद्यमान पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्याकडे सध्या त्या देशाची सूत्रे असली तरी त्यांचा वकुब यथातथाच आहे. ही अस्थिरता मोडून काढण्याची त्यांच्यात कितपत कुवत आहे याची शंकाच आहे. त्यामुळे पाकिस्तानचे भवितव्य आणखीनच दोलायमान झाले आहे, असा निष्कर्ष कोणीही सहज काढू शकेल. भारताच्या दृष्टीने ही चिंतेचीच बाब राहणार आहे. कारण, अस्थिर आणि अस्वस्थ शेजारी हा नेहमीच घातक आणि त्रासदायक असतो. त्यामुळे भारताला तेथील नव्या घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे लागणार आहे.