भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या तिन्ही राज्यांचे मुख्यमंत्री निवडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री या आधीच जाहीर झाले होते, आज भाजपने राजस्थानचा मुख्यमंत्रीही जाहीर केला. राजस्थानात भाजपने भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री करून सर्वांनाच चकित केले आहे. राजस्थानातील अनेक दिग्गज नेते या पदाच्या स्पर्धेत होते, ते सारे एका झटक्यात बाद ठरवण्यात आले आहेत. वसुंधराराजे यांनी आमदारांची जुळवाजुळव करून दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला होता, परंतु तो साफ झुगारून देण्यात आला आहे. त्यातही भाजपश्रेष्ठींनी सर्वच इच्छुकांच्या जखमेवर असे मीठ चोळले आहे की, त्यांनी पहिल्यांदाच आमदार झालेल्या माणसाला राजस्थानचे थेट मुख्यमंत्री पद दिले आहे. तिन्ही राज्यांमध्ये अनपेक्षित नेत्यांची निवड करून भाजप श्रेष्ठींनी म्हणजेच मोदी-शहांनी पक्ष संघटनेवरील आपली पकड कमालीची मजबूत केली असून त्यांना आव्हान देण्याची ताकद आता भाजपमध्ये कोणामध्येच शिल्लक नाही आणि कोणी ब्र ही काढू शकणार नाही, असा संदेश पसरवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
या तिन्ही राज्यांतील मुख्यमंत्रिपदावर ज्या नवख्या नेत्यांची निवड करण्यात आली आहे, त्यातून अनेक संदेश एकाच वेळी दिले गेले आहेत. यातील पहिला ठळक संदेश म्हणजे कोणत्याही राज्यांतील कोणाही प्रबळ नेत्याचे यापुढे काहीही चालणार नाही. दुसरा संदेश म्हणजे त्यांनी जातीची समीकरणे व्यवस्थित जुळवून सर्वच जातींना भाजप सामावून घेतो हा महत्त्वाचा व हिशेबी संदेश दिला आहे. त्यांनी छत्तीसगडमध्ये आदिवासी आमदाराला मुख्यमंत्री केले, मध्य प्रदेशात ओबीसी नेत्याच्या गळ्यात ही माळ पडली आणि राजस्थानात ब्राह्मण समाजाला ही संधी दिली गेली. ब्राह्मण समाज हा अगदी सुरुवातीपासून संघ-भाजपचा समर्थक समाज आहे. त्यामुळे सामाजिक समीकरण व्यवस्थित जुळवण्यात भाजपश्रेष्ठी यशस्वी झाल्याचा आणखी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. भाजप पक्ष संघटनेत वरिष्ठ पदांवर आता कोणालाही बसवण्याचा धाडसी निर्णय पक्षाचे वरिष्ठ कसलाही मुलाहिजा न बाळगता घेऊ शकतात हा तिसरा महत्त्वाचा संदेश यातून दिला गेला. तीन राज्यांत निवडण्यात आलेल्या या तिन्ही नेत्यांना संघ कार्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे संघटनेत कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रामाणिक कार्य करणार्यांनाच आता यापुढे वरिष्ठ पदावर संधी मिळेल असा संघटनेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला संदेशही त्यांनी दृढ केला आहे.
काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्षांपेक्षा आपले हे वेगळेपण ठळकपणे दाखवून देण्यातही भाजप यानिमित्ताने यशस्वी ठरला आहे. पण आता प्रश्न असा आहे की, ज्या ज्येष्ठांना डावलेले गेले आहे ते अगदी शेवटपर्यंत मूग गिळून गप्प बसतील काय. मध्य प्रदेश सारख्या राज्यात शिवराजसिंह चौहान यांनी एकहाती पक्षाला यश मिळवून दिले आहे. त्यांना पहिल्यापासूनच दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न भाजप श्रेष्ठींनी केला. त्यांची उमेदवारीही जाहीर करण्यास विलंब करण्यात आला. शिवराजसिंह यांना उमेदवारी जाहीर होण्यासाठी चौथ्या यादीपर्यंत वाट पाहावी लागली. मध्य प्रदेशातील प्रचार सभांमध्ये शिवराजसिंह यांचे नाव घेणेही मोदींनी अनेक वेळा टाळले. इतके सगळे होऊनही शिवराजसिंह यांनी खचून न जाता अगदी प्रामाणिकपणे पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कसोशीचे प्रयत्न केले आणि भाजपच्या हातातून गेलेली बाजी त्यांनी खेचून आणली. मध्य प्रदेशात भाजप हरणार असाच बहुतेक राजकीय निरीक्षकांचा होरा होता;
पण भाजपला तिथे दणदणीत यश मिळाले. या पार्श्वभूमीवर त्यांना डावलून मोहन यादव या फारशा माहिती नसलेल्या उमेदवारांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. बहुतेक ठिकाणी या नवख्या नेत्यांच्या मदतीसाठी दोन-दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. या सगळ्याचा भाजपला भविष्यात संघटनात्मदृष्ट्या चांगला लाभ होऊ शकतो. कारण, या निमित्ताने मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाच्या तोडीचे अनेक नवे चेहरे लोकांपुढे प्रस्थापित करण्यात पक्ष यशस्वी ठरतो. अर्थातच भविष्यातील निवडणुकांसाठी या नेत्यांची फौज पक्षाच्या प्रचारासाठी वापरता येते. आज राजस्थानचा जो निर्णय झाला आहे तो तेथील भाजपच्या प्रबळ नेत्या वसुंधराराजे यांचे राजकीय वर्चस्वच संपुष्टात आणणारा ठरणार आहे. बरेच दिवस त्यांच्या दबदब्यापुढे भाजपचे दिल्लीतील नेते दबून असायचे. त्यांचा हा दबदबा आता जवळपास संपुष्टात आला आहे. अर्थात, वसुंधराराजे यांचे राजस्थानातील पक्षसंघटनेत वर्चस्व असले तरी त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारात फार झोकून देऊन काम केले असे दिसले नाही.
किंबहुना त्यांनी ऐन प्रचाराच्या काळात आता आपल्याला राजकीय संन्यास घ्यावा असे वाटू लागले आहे असे विधान करून पक्षात अस्वस्थताच निर्माण केली होती. त्यांच्या या विधानाने पक्षाचे वातावरणही खराब करण्याचा त्यांचा मनसुबा होता असे मानले गेले होते. पण या सार्या घटना मागे टाकून भाजपने आता राजस्थानात आणि अन्य दोन राज्यांमध्ये चांगली सुरुवात केली आहे. राजस्थान सारखे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य एका नवख्या माणसाच्या हातात सोपवण्याची जोखीम मोदी-शहा सहजपणे घेऊ शकतात असेही यातून दिसून आले आहे. तिन्ही महत्त्वाच्या राज्यांमध्ये नेतृत्व बदलाचा हा धाडसी निर्णय मोदी-शहांनी घेऊन एक मोठी खेळी केली आहे. यातूनच त्यांचा आत्मविश्वास अधिकच झळकला आहे. नव्या नेतृत्वाला अशी एकदम मोठी संधी देण्याचे काम काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे नेते करू शकतील काय, हा आता महत्त्वाचा प्रश्न आहे.
कोणत्याही राजकीय संघटनेत राजकीय साचलेपणा येता कामा नये. त्यातून पक्षाचेच नुकसानच होते. पण हा साचलेपणा दूर करायचा तर धडाडीने निर्णय घ्यावे लागतात, त्याच्या राजकीय परिणामांची फार तमा बाळगून चालत नाही हाच धडा यानिमित्ताने भाजप श्रेष्ठींनी दिला आहे. तो अनुकरणीय आहे. अनेक नवोदितांना आपल्यालाही भविष्यात मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते, असा विश्वासही संघटनेमध्ये त्यातून निर्माण होणार आहे.