नवी दिल्ली – धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी धक्का बसल्याचे सांगितले. तसेच धोनीला निरोपाचा सामना द्यावा व त्याला प्रत्यक्ष मैदानावर अलविदा करावे, अशी मागणीही सोरेन यांनी बीसीसीआयकडे केली आहे.
तसेच विश्वकरंडकासह अनेक मानाच्या स्पर्धा जिंकून देणारा धोनी कायमच त्याच्या खेळाच्या जोरावर लक्षात राहील. मात्र, त्याच्यासारख्या खेळाडूची निवृत्ती अशी गपचूपपणे जाहीर व्हावी हे पटत नाही. मात्र, आता त्याने निर्णय घेतला आहे, त्यामुळे त्याचा मान ठेवलाच पाहिजे. असे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार बेस्ट फिनिशर व अव्वल यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी याने अखेर चर्चांना पूर्णविराम देत 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. “मैं पल दो पल का शायर हूं’, या मुकेश यांनी गायलेल्या गाण्याच्या ओळींसह चार मिनिटांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी आपल्याला निवृत्त समजले जावे, अशी पोस्ट करत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.