नवी दिल्ली – पुढील अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, असे वक्तव्य निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी केले आहे. ज्याप्रमाणे आधीची 40 वर्षे कॉंग्रेसची होती, त्याप्रमाणे आगामी अनेक दशके भारतीय जनता पक्ष भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू राहील. तो पक्ष जिंकेल किंवा कदाचित हरेलही; मात्र त्याचा त्यांच्या प्रभावाशी काही संबंध नाही. भारतात एकदा एखाद्या पक्षाने 30 टक्के मते मिळवली, की त्याचा प्रभाव कमी कालावधीत घटत नाही असे त्यांनी नमूद केले.
गोव्यात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसला कितपत संधी आहे, याची चाचपणी करण्यासाठी किशोर गोव्यात आले असून त्यावेळी त्यांनी येथील पत्रकारांशी संवाद साधला. तृणमूलच्या प. बंगालमधील विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्यामुळे गोव्यात ते काय कमाल करून दाखवणार याबाबत उत्सुकता असताना त्यांनी भाजपची बाजू भक्कमच असल्याचे वक्तव्य करून कॉंग्रेस पक्षाला व या पक्षाच्या नेतृत्वाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला.
बंगाल विधानसभा निवडणुकीतनंतर प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांची राहुल गांधी अन प्रियंका वढेरा यांच्याशी बोलणीही झाली होती. कॉंग्रेसमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. मात्र किशोर यांचे आजचे वक्तव्य थेट राहुल यांनाच लक्ष्य करणारे आहे. ते म्हणाले, नागरिक सरकारवर रागावले असल्यामुळे मोदींची सत्ता नेस्तनाबूत करतील, अशा भ्रमात कोणीही राहू नये. कदाचित नागरिक मोदींना परत निवडून देणार नाहीत; मात्र तरीही भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील. विरोधी पक्षांना अनेक दशके भाजपचा सामना करावा लागेल. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची ताकद ओळखावी असा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
राहुल नरेंद्र मोदींची क्षमता ओळखून घेत नाहीत. ते असा विचार करत आहेत, की काही कालावधीनंतर नागरिक मोदींना सत्तेतून हटवतील; मात्र तसे होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांच्याविरुद्ध लढू शकणार नाही. मोदींची बलस्थाने कोणती हे समजून घेण्यास पुरेसा वेळ न देता लोक त्यांच्या लोकप्रियतेबाबतच विचार करत बोलतात. पण मोदींचा सामना करायचा असेल, अगोदर त्यांची ताकद समजून घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांचे युग संपण्याची वाट पाहत बसणे ही राहुल गांधी यांची चूक आहे. तसेच, मोदी लाट असेपर्यंतच भाजप सत्तेत राहील मानणे देखिल चूक आहे, असेही त्यांनी सांगितले.