मुंबई – ‘बाहुबली’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. या चित्रपटाच्या दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. नुकतेच या चित्रपटाबाबत एका मुलाखतीत भल्लालदेवची भूमिका साकारलेला अभिनेता राणा डग्गुबातीने काही खुलासे केले आहेत. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी करोडो रुपयांचे कर्ज घेतल्याचे त्याने सांगितले आहे.
राणा डग्गुबातीने सांगितले की, “दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी बाहूबली चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. त्यावेळी त्यांनी साधारण 300 ते 400 कोटींचे कर्ज घेतले होते. त्यावेळी निर्माते चित्रपटासाठी घर किंवा त्यांची खासगी मालमत्ता बँकेत गहाण ठेवून बँकेकडून कर्ज घ्यायचे. त्याकरिता निर्माते बँकेला 24 ते 28 टक्के व्याज देत होते.”
पुढे तो म्हणाला, “बाहुबली-1’साठी निर्मात्यांनी 189 कोटींचे कर्ज घेतले होते. निर्मात्यांनी साडेपाच वर्षांच्या परतफेडीसाठी हे कर्ज घेतले होते. यासाठी व्याजदर 24 टक्के इतका होता. या चित्रपटावर दुप्पट पैसे खर्च करण्यात आला होता. व्याजाच्या पैशातून निर्मात्यांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा काही भागही शूट केला होता. कर्ज घेण्याअगोदर निर्मात्यांनी हा चित्रपट किती कमाई करेल याचा काहीच विचार केला नव्हता.”
दरम्यान, 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ या चित्रपटाने 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. तर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने 500 कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटातील प्रभास आणि राणा डग्गुबातीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती.