25 कोटींच्या नुकसानीचा आकडा : माहिती अधिकारातून पुढे आले वास्तव
पुणे – सन 2015-16 पासून 58 महिन्यांत 25 कोटींहून अधिक किमतीचे गहू-तांदूळ खराब झाले आहेत, अशी धक्कादायक माहिती माहिती अधिकारातून समोर आली आहे. “एफसीआय’ने दिलेल्या माहितीनुसार, 2015-16 ते जानेवारी 2020 या कालावधीत 0.216 एलएमटी (लाख मेट्रिक टन) गहू-तांदूळ खराब झाले.
एखाद्या धान्याचे भाव गडगडल्यास, हमी भावात त्याची खरेदी सरकारला करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. याशिवाय अन्य माध्यमातून उपलब्ध झालेले धान्य साठवणुकीसाठी भारतीय अन्न धान्य महामंडळ महत्त्वाची भूमिका बजावते. विविध राज्यांमधील शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले धान्य साठवणुकीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास हे धान्य उघड्यावर ठेवल्यास, ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. अवकाळी पाऊस, भटकी जनावरे, उंदीर-घुशींकडून पाडला जाणारा फडशा अशा विविध कारणांमुळे धान्याची नासाडी होते.
एकीकडे देशातील लाखो नागरिक अर्धपोटी झोपत असल्याचे वास्तव असताना, कोट्यवधी रुपये किंमतीचे धान्य खराब होण्याचे विदारक वास्तवदेखील आहे.
एफसीआयच्या गोदामात जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या धान्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असून 2015-16 पासून 58 महिन्यांत खराब झालेल्या गहू-तांदळाची किंमत ही 25 कोटी 12 लाख इतकी होती. यात 9 कोटी 24 लाख रुपयांचे गहू व 15 कोटी 88 लाखांच्या तांदळाचा समावेश होता, असे या खुलाशातून पुढे आले आहे.
गोदामांची उभारणी आवश्यक
अन्नधान्य महामंडळाकडून खरेदी केलेले धान्य वेळेत गोदामांमध्ये पोच करणे आवश्यक आहे. त्याकरिता वेळेत वाहतूक होणे गरजेचे आहे. त्यामुळे हे अन्नधान्य वाया जाण्यापासून वाचू शकणार आहे.